मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभारण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या समितीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह शासकीय अधिकारी आणि इतिहासतज्ज्ञांचा समावेश आहे. विनोद पाटील यांनी राज्य शासनाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला ३९५ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आग्रा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मा. मुख्यमंत्री महोदयांनी असे आश्वासन दिले की, “आग्रा शहरात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैद करून ठेवले होते, ती वास्तू महाराष्ट्र शासनामार्फत अधिग्रहीत करुन तेथे भव्य स्मारक उभारण्यात येईल, आणि याकरीता आवश्यक त्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल.” त्यानुसार पर्यटन विभागास नोडल विभाग म्हणून निदेशित केले आहे. महाराजांच्या आग्रा येथील मुक्कामी असलेल्या नजरकैदेतील वास्तूच्या /स्थळाच्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्यासाठी सदर ठिकाणी ऐतिहासिक पुराव्यासह जागा निश्चिती आणि भव्य स्मारक उभारण्यासह इतर बाबींकरिता पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.







