अहिल्यानगर : डिजिटल युगात संगणक साक्षरता ही शिक्षण आणि रोजगारासाठी अत्यावश्यक बनत असताना, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने आठवी ते बारावीतील विद्यार्थिनींसाठी मोफत एमएस-सीआयटी (MS-CIT) संगणक प्रशिक्षण सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेकडून सुमारे ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, जिल्ह्यातील ६०० हून अधिक विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील अनेक मुलींना आर्थिक अडचणींमुळे संगणक प्रशिक्षण घेणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून पुनर्विनियोजन करून ही योजना राबविण्यात येणार आहे. विद्यार्थिनींना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थिनीच्या प्रशिक्षणासाठी सुमारे पाच हजार रुपयांचा खर्च जिल्हा परिषद उचलणार असून, योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) आणि जिल्हा परिषद यांच्यात करार करण्यात येणार आहे. एमकेसीएलच्या माध्यमातूनच प्रशिक्षण दिले जाणार असल्याने या योजनेबाबत विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
एमएस-सीआयटी प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थिनींना संगणकाचे मूलभूत ज्ञान, इंटरनेटचा प्रभावी वापर, ऑनलाइन सेवा, ई-गव्हर्नन्स, कार्यालयीन कामकाज तसेच विविध डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार आहे. आजच्या काळात सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील अनेक नोकऱ्यांमध्ये संगणक ज्ञानाला विशेष महत्त्व दिले जात असल्याने या प्रमाणपत्राचा विद्यार्थिनींच्या करिअरमध्ये दीर्घकालीन फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि डिजिटल सेवांचे वाढते महत्त्व लक्षात घेता ग्रामीण भागातील मुलींना डिजिटल प्रवाहाशी जोडणे ही काळाची गरज असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी नमूद केले आहे. तब्बल १२ वर्षांनंतर ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. मुलींच्या डिजिटल शिक्षणाला चालना देण्याबरोबरच त्यांना तंत्रज्ञानाच्या युगात आत्मविश्वासाने पुढे जाण्यास सक्षम करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.





