नवी दिल्ली: भारताचा संघाला ऑस्ट्रेलियन संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ३-१ असा पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताच्या अनुभवी त्याचबरोबर टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी देखील केलेल्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघाला मोठा ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता आगामी मालिकेमध्ये भारताचा संघ कशी कामगिरी करेल हे पाहणं मनोरंजक ठरेल. भारताचा संघ चॅम्पियन ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माला मालिकेमध्ये झालेल्या पराभवामुळे मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता आता यावर भारताचा माजी खेळाडू युवराज सिंहने ट्रोलर्सला सडेतोस उत्तर दिले आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवर झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर टीकेचे लक्ष्य झाले आहेत. नुकतीच बीसीसीआयने संघाच्या खराब कामगिरीबाबत आढावा बैठकही घेतली. रोहितला कर्णधारपद सोडून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, भारताचा माजी फलंदाज युवराज सिंग रोहित आणि गंभीरच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. तो म्हणतो की, गंभीरला थोडा वेळ देण्याची गरज आहे, कारण त्याचा भारतीय कॅम्पमध्ये प्रवेश घाईघाईने झाला आहे. रोहितबाबत युवी म्हणाला की, त्याने सिडनी कसोटीतून ज्या प्रकारे स्वत:ला वगळले, तसे याआधी क्वचितच कोणत्याही कर्णधाराने केले असेल.
युवराज सिंग म्हणाला, “गौतम गंभीर नुकताच सिस्टीममध्ये आला आहे आणि त्याला आणखी थोडा वेळ देण्याची गरज आहे. रोहितने आम्हाला T-२० विश्वचषक जिंकून दिला आणि त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली. बॉर्डर-गावसकर मालिकेतील शेवटच्या कसोटीत तो स्वत: संघातून बाहेर पडला, त्यामुळे दुसऱ्याला संधी मिळावी, मला सांगा, यापूर्वी किती कर्णधारांनी असे केले आहे? गेल्या तीन ते पाच वर्षांत रोहितने काय केले ते मी पाहतोय, एका स्पर्धेने काहीही ठरवले जात नाही. माझ्यासाठी न्यूझीलंडकडून घरच्या मैदानावर झालेला पराभव अधिक निराशाजनक होता. रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतीय संघाला न्यूझीलंडकडून त्यांच्याच घरच्या मैदानावर ३-० असा पराभव स्वीकारावा लागला होता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात किवी संघाने भारताला त्यांच्याच भूमीवर कसोटीत पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ होती. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरही टीम इंडिया रोहितच्या नेतृत्वाखाली वाईटरित्या संघर्ष करताना दिसली. संघाला दुसऱ्या आणि चौथ्या कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले, त्यामुळे कांगारूंच्या भूमीवर सलग तिसऱ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले.







