कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १३०० वर्षांचा इतिहास असलेल्या जिनसेन स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या नांदणी मठातील ‘महादेवी’ उर्फ ‘माधुरी’ या हत्तीणीला गुजरातमधील वनतारा हत्ती संगोपन केंद्रात हलवून एक वर्ष पूर्ण झाले आहे. वर्ष उलटून गेले असले तरी माधुरीच्या आठवणी आजही नांदणी ग्रामस्थांच्या मनात ताज्याच आहेत. तिच्या घरवापसीसाठी ग्रामस्थांनी एक दिवसाचा लाक्षणिक उपवास करत विशेष प्रार्थना केली. ग्रामस्थांच्या मते, माधुरी ही केवळ मठातील हत्ती नव्हती, तर नांदणी गावाच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग होती. त्यामुळे तिला पुन्हा नांदणी मठात आणण्यात यावे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. येत्या १३ सप्टेंबर रोजी परमपूज्य प्रथमाचार्य श्री शांतीसागरजी महाराज यांची ७१ वी जयंती प्रथमच नांदणी येथे मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात माधुरीची उपस्थिती असावी, अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी सकारात्मक निर्णय घेऊन तिची घरवापसी लवकरात लवकर करावी, अशी मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर नांदणी मठातील निशीधिका येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री महादेव जानकर आणि ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण करून माधुरीच्या सुरक्षित आणि सन्मानपूर्वक पुनरागमनासाठी प्रार्थना केली.
माधुरीला गुजरातमधील वनतारा केंद्रात हलवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तसेच प्राणी संरक्षण संस्थांच्या आग्रहानंतर घेण्यात आला होता. या निर्णयानंतर कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता. त्यानंतर उद्योगपती अनंत अंबानी यांच्या हस्तक्षेपानंतर वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी यांनी नांदणीत येऊन मठ प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांसोबत संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीत नांदणी मठातच अत्याधुनिक हत्ती संगोपन केंद्र उभारून माधुरीला पुन्हा आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, एक वर्ष उलटूनही तिची घरवापसी झालेली नाही. यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी, “१३ सप्टेंबरपूर्वी माधुरीला नांदणीत परत आणावे. अन्यथा जयंती सोहळ्यासाठी येणाऱ्या श्रावक-श्राविकांच्या भावना तीव्र झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल,” असा इशारा दिला. दरम्यान, माधुरीच्या पुनरागमनासाठी नांदणी मठात आधुनिक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तिच्या निवासासाठी रबरी मॅटिंग, एक्झॉस्ट फॅन, स्प्रिंकलर व्यवस्था तसेच प्रथमोपचारासाठी स्वतंत्र इमारत तयार करण्यात आली आहे. उच्चस्तरीय समिती आणि वनताराने सुचविलेल्या सर्व सुविधांची पूर्तता करण्यात आल्याची माहिती गावकरी रामगोंडा अण्णा पाटील यांनी दिली. नांदणी मठ हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि सीमाभागातील सुमारे ७५० मठांचे प्रतिनिधित्व करणारा ऐतिहासिक मठ असल्याने माधुरीच्या घरवापसीला व्यापक भावनिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तिच्या पुनरागमनासाठी विविध गावांमध्ये डिजिटल फलक लावून जनजागृती करण्यात आली असून, एकदिवसीय लाक्षणिक उपोषणालाही मोठा पाठिंबा मिळाला. आता सर्वांच्या नजरा प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागल्या असून, माधुरी लवकरच नांदणीत परतावी, अशी ग्रामस्थांची एकमुखी अपेक्षा आहे.





