मुंबई : अलीकडे आता बाळासाहेबांचं नाव घ्यायला आणि त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणायलाही काहींना लाज वाटत आहे. मात्र, हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोटींना ही लाज वाटत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यापासून आपण शिवसेना मुक्त केली आहे. आझाद मैदानावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार परड आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांच्या उल्लेखापासून केली आहे. ते म्हणाले की, ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ ही गर्जना करून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा भाषणाची सुरुवात करायचे तेव्हा सर्वांच्या अंगावर काटा उभा राहायचा. ‘गर्व से कहो हम हिन्दू हैं’. ही सिंह गर्जना बाळासाहेबांनी सर्वांना दिली. काही जणांना आता हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू राहिली आहे. हिंदुहृदयसम्राट म्हणायला काही जणांची जीभ कचरू लागली आहे. पण आपल्याला हा शब्द उच्चारायला लाज नाही तर अभिमान आणि स्वाभिमान वाटतो. गारगोट्यांना आता लाज वाटतेय. बाळासाहेबांच्या विचारांशी बेयमानी करणाऱ्यांपासून शिवसेना आपण मुक्त केली. म्हणून आझाद शिवसेनेचा हा आझाद मेळावा आहे. येथे शिवसैनिकांचा जनसागर आला आहे. चारही बाजूंनी लोक येत आहेत. याठिकाणी भगवा उत्साह संचारला आहे.
खरं म्हणजे, महाराष्ट्र विरोधी आघाडीला घरी पाठवून आपलं सरकार आलं. तेव्हा काही लोक म्हणत होते. हे सरकार १५ दिवस टिकणार नाही. एका महिन्यात पडेल. दुसऱ्या महिन्यात पडेल. सहा महिन्यात पडेल. पण टीका करणाऱ्यांना हा एकनाथ शिंदे परून उरला. जनतेच्या आशीर्वादाने आणि साथीने घासून नाही तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली. कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तर आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. असा जाणार नाही. मला हलक्यात घेऊ नका. मी मैदानातून पळणारा नाही पळवणारा आहे. कट्टर शिवसैनिक मैदानही सोडत नाही आणि विचार ही सोडत नाही. म्हणून आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन निघालो आहेत. आज या महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे मी जातो. तिकडे माझे हसत-हसत स्वागत करतात. या दोन वर्षाच्या काळात आपलं सरकार लाडके सरकार झाले आहे. लाडक्या बहिणीचे लाडके सरकार. लाडक्या भावाचे लाडके सरकार. लाडक्या शेतकऱ्यांचं लाडके सरकार. आपण उठाव का केला हे सांगण्याची गरज नाही. बाळासाहेबांनी सांगितले होते की अन्याय सहन करू नका. त्यामुळे आम्ही उठाव केला. हा उठाव केला नसता तर शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं असते. त्यामुळे महाराष्ट्र अनेक वर्षे मागे गेला असता. आपलं सरकार आल्यावर राज्य पहिल्या नंबरवर आणलं. याचा अभिमान आहे. अनेक गोष्टींमध्ये आपलं सरकार पहिल्या नंबरवर आहे.





