नागपूर : दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड अवैध ठरवून आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिकाही दाखल केली आहे. या याचिकेवर गुडधे यांच्या वतीने लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला असून, त्यानंतर न्यायालयाने याचिकेवरील निकाल राखूव ठेवला आहे. या निर्णयाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या याचिकेवर दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद सादर करण्यात आले आहेत. यामध्ये फडणवीस यांनी याचिकेला जोरदार विरोध दर्शवला आहे. निवडणूक याचिका दाखल करताना खुद्द उमेदवाराची उपस्थिती आवश्यक असते. मात्र, याचिकाकर्ते गुडधे स्वतः गैरहजर होते, त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात यावी, असा युक्तिवाद फडणवीस यांचे वरिष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर यांनी यापूर्वीच्या सुनावणीत केला होता. सध्या या याचिकेवरील निकाल न्यायालयाने राखीव ठेवला असून, त्याकडे राज्याच्या राजकारणात उत्सुकतेने पाहिले जात आहे.







