मुंबई : गेल्या चार वर्षापासून बेस्टमध्ये कंत्राटी कामगार म्हणून आम्ही काम करीत असून गेल्या आठ महिन्यापासून आम्ही आमच्या मागण्यांबाबत बस पुरठादार कंपन्यांकडे पत्रव्यवहार करीत आहोत. त्यांना भेटण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र आम्हाला भेट मिळत नाही. आता आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत. आम्हाला मुख्यमंत्रीच न्याय देतील असा विश्वास बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी व्यक्त केला आहे. बेस्ट उपक्रमातील कंत्राटी बसचालक आणि बसवाहक यांना बेस्ट उपक्रमामध्ये कायमस्वरूपी सामावून घेणे, ज्या बसचालक आणि बसवाहकांना काही कारणानिमित्त कायमस्वरूपी करून घेता येत नसेल तर बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून कंत्राटी पध्दतीने का होईना परंतु ‘समान काम समान वेतन’ या न्यायाने काम करण्याची संधी द्यावी.
बेस्ट उपक्रमामध्ये कायमस्वरूपी करून घेत असताना वयाची अट शिथिल करून सर्व प्रवर्गासाठी वय ५० वर्षे करावे, बेस्ट उपक्रमाने कंत्राटदारांच्या सोबत केलेल्या करारात बदल करून कंत्राटदारांची जबाबदारी फक्त बस पुरवठा व बस देखभाल या संदर्भात निश्चित करावी, सर्व मनुष्यबळ बेस्ट उपक्रमाचे असावे. मागील कालावधीमध्ये कंत्राटी कामगारांना काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली किंवा वैयक्तिक कारणामुळे काम सोडले. त्यांनाही बेस्टमध्ये नोकरीची संधी मिळावी आदी मागण्या कामगारांनी केल्या आहेत. या मागण्यांबाबत आम्ही गेल्या आठ महिऩ्यापासून कंत्राटदार कंपऩ्यांशी आम्ही चर्चा करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. मात्र कंत्राटदार आमची म्हणणे एकून घेत नाहीत. त्यामुळे आमची शिष्टमंडळ मुख्यमंत्री शिदे यांना भेटणार आहोत. तेच आम्हाला न्याय देतील असा विश्वास कंत्राटी कामगारांना वाटत आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक यांनी बस पुरवठादारांना नवीन भरती करण्यास सांगितले आहे. मात्र आम्हाला शंभर टक्के बेस्टचे नियम लावले जात असतील तर आम्हाला समान वेतन का नाही असा सवाल कंत्राटी कामगारांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री शंभुराज देसाई यांना भेटून कामगारांना निवेदन दिले आहे. मात्र कोणताही निर्णय त्यांनी घेतला नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत होणा-या भेटीकडे सर्व कामगारांचे डोळे लागले आहेत.
विविध राजकीय पक्षाचे नेते आणि पदाधिकारी आझाद मैदानात बेस्टच्या कंत्राटी कामगारांना भेट देत आहे. आमच्या प्रश्नाबाबत ज्यांना सहानुभूती आहे. त्यांनी आम्हाला मदत करावी, आमचा प्रश्न सोडला, अशी मागणी कंत्राटी कामगारांनी केली आहे. आम्हाला २२ हजार ५०० रुपये वेतन ठरले आहे. मात्र १७ हजार ते १८ हजार रुपये इतके वेतन दिले जात आहे. आम्ही जगायचे कसे असा सवाल कामगार करीत आहेत.