पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात परीक्षांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये गोपनीयता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेत प्रायोगिक तत्त्वावर एका विषयाची प्रश्नपत्रिका डिजिटल पद्धतीने थेट परीक्षा केंद्रावर पाठवण्याची योजना आखण्यात आली आहे. तसेच परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून त्यांचे ऑनस्क्रीन मूल्यमापन करण्याचाही विचार राज्य मंडळाकडून केला जात आहे. राज्य मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या परीक्षांदरम्यान बारामती येथे डिजिटल ट्रंकचा वापर करून प्रश्नपत्रिका पाठविण्याचा प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर आता आणखी आधुनिक पद्धतीचा अवलंब करण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
राज्य मंडळाच्या नियोजनानुसार, प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपात थेट परीक्षा केंद्रावर पाठवल्या जाणार असल्याने पारंपरिक वाहतूक प्रक्रियेतील धोके कमी होण्याची शक्यता आहे. यासाठी स्वतंत्र डिजिटल यंत्रणा विकसित करण्यात येत असून, परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून त्यांचे ऑनस्क्रीन मूल्यांकन केले जाणार आहे. या प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. यंदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने बारावीच्या परीक्षांमध्ये ऑनस्क्रीन मूल्यांकन पद्धतीचा वापर केला होता. काही विद्यापीठांमध्येही अशा प्रणालीचे प्रयोग सुरू आहेत. मात्र, राज्य मंडळाकडून पहिल्यांदाच अशा प्रकारे प्रायोगिक स्तरावर डिजिटल परीक्षा व्यवस्थेची चाचणी घेण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे प्रश्नपत्रिका गळती रोखणे, मूल्यमापन अधिक वेगवान आणि पारदर्शक करणे तसेच परीक्षाप्रक्रियेवरील विश्वास वाढवणे शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







