मुंबई : बेस्ट उपक्रमातील कायम कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि खासगी कंपन्यांमार्फत कार्यरत असलेल्या कामगारांच्या न्याय्य मागण्यांकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप बेस्ट वर्कर्स युनियन आणि संघर्ष कामगार कर्मचारी युनियनने केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या कामगार संघटनांनी १० नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी स्पष्ट केले की, प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही. बेस्ट प्रशासनाच्या या उदासीनतेविरोधात कामगार संघटना आक्रमक झाल्या असून, १० नोव्हेंबरपासून आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ‘एसएमटीएटीपीएल असोसिएट्स’, ‘मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्युशन्स’, ‘बीव्हीजी इंडिया लि.’, ‘स्विच मोबिलिटी’, ‘ओलेक्ट्रा’ यांसारख्या खासगी कंपन्यांमार्फत कार्यरत कर्मचाऱ्यांचे काम बेस्टच्या कायम कर्मचाऱ्यांप्रमाणेच आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यानाही ‘समान कामाला समान दाम’ या तत्त्वानुसार बेस्टमधील समकक्ष कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनमान आणि सेवा-शर्ती लागू करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी युनियनने केली आहे. बेस्ट प्रशासन आणि मुंबई महापालिकेकडून मागण्यांवर ठोस निर्णय न मिळाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा स्पष्ट इशारा बेस्ट वर्कर्स युनियनने दिला आहे. संघटनांनी दिलेल्या या चेतावणीमुळे बेस्ट व्यवस्थापनासमोर पुन्हा एकदा मोठे तणावाचे सावट निर्माण झाले आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.







