मुंबई : राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठी हालचाल झाली असून बच्चू कडू यांनी शिंदे गटाच्या शिवसेना मध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार असून, कडू आज (३० एप्रिल) विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय सत्तेसाठी नसून शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांच्या हितासाठी घेतला आहे. शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत हमीभाव, पेरणी ते कापणीपर्यंतच्या प्रश्नांसह आदिवासी व दिव्यांगांच्या मुद्द्यांवर सहमती झाल्यानंतरच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
कडू यांनी ‘लाडकी बहिण’ योजनेत विधवा महिलांकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. तसेच दिव्यांग मंत्रालय अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. “मला मंत्रीपदाची अपेक्षा नाही; मला मागण्याची सवय नाही. आमचा लढा दिव्यांग मंत्रालयासाठी आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी जनहिताला प्राधान्य दिले. पुढे ते म्हणाले की, शिवसेनेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र शेतकरी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रहार संघटना सामाजिक कार्यासाठी कायम राहील, तसेच कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करत आयुष्याची सांगता शिवसेनेतच व्हावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.







