विरार : वसई-विरार महापालिका हद्दीतील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला असून शहरातील सहा स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार यंत्रणा उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ₹१० कोटी ४७ लाख ३४ हजारांचा निधी खर्च करण्यात येणार असून संबंधित प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे. शहरात सध्या शंभरहून अधिक स्मशानभूमी असून अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. काही स्मशानभूमींमध्ये धूर बाहेर जाण्यासाठी आवश्यक चिमण्या नसल्याने अंत्यसंस्कारावेळी निर्माण होणारा धूर थेट आसपासच्या परिसरात आणि नागरी वस्त्यांमध्ये पसरतो. त्यामुळे वायूप्रदूषणासह नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याच्या तक्रारी सातत्याने महापालिकेकडे येत होत्या. काही स्मशानभूमींमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव, दुरवस्था आणि अपुऱ्या व्यवस्थेमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या सर्व बाबींचा विचार करून प्रदूषण नियंत्रणासोबत आधुनिक आणि पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार दिवाणमान, नवघर, तुळींज, आचोळे, फुलपाडा आणि विराटनगर येथील सहा स्मशानभूमींमध्ये अत्याधुनिक ‘इको-फ्रेंडली’ गॅसिफिकेशन तंत्रज्ञानावर आधारित अंत्यसंस्कार यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पारंपरिक पद्धतीतील त्रुटी दूर होण्याबरोबरच प्रदूषणात मोठी घट होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
या आधुनिक अंत्यसंस्कार प्रणालीमुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच वेळ, इंधन आणि संसाधनांची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. पारंपरिक अंत्यसंस्कारासाठी सुमारे ४५० किलो लाकूड लागते, मात्र नव्या गॅसिफिकेशन तंत्रज्ञानामुळे हा वापर अवघ्या १२५ किलोपर्यंत कमी होणार आहे. तसेच सध्या अंत्यसंस्कारासाठी लागणारा ४ ते ५ तासांचा कालावधी कमी होऊन तो केवळ दीड तासांमध्ये पूर्ण होणार आहे. ही प्रणाली ‘नॅचरल ड्राफ्ट’ तत्त्वावर कार्यरत असून त्यातील स्क्रबर युनिट सौरऊर्जेवर चालणार आहे. धूर थेट वातावरणात सोडण्याऐवजी चार टप्प्यांच्या गाळणी प्रक्रियेनंतर १०० फूट उंच चिमणीद्वारे उत्सर्जित केला जाणार असल्याने प्रदूषणाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल. विशेष म्हणजे या प्रणालीमध्ये सर्व हिंदू धार्मिक विधी आणि परंपरांचे तंतोतंत पालन केले जाणार असून धार्मिक भावना आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समतोल राखण्यात आला आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, या तंत्रज्ञानामुळे हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात सुमारे ६० टक्क्यांनी घट होईल, तर अंत्यसंस्कारानंतर केवळ २ टक्के अवशेष शिल्लक राहतील. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण, वायूप्रदूषणावर नियंत्रण आणि नागरिकांना अधिक सुरक्षित व सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





