नवी दिल्ली : भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अजित आगरकरवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी अजित आगरकरची नियुक्ती करण्यात आली आहे. अजित आता चेतन शर्मा यांच्या जागी भारतीय संघाचा मुख्य निवडकर्ता बनला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की अजित आगरकरडे निवड समितीचं अध्यक्षपद सोपवलं जाईल. त्यावर आज (४ जुलै) बीसीसीआयने शिक्कामोर्तब केलं आहे.
एका स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकल्यानंतर भारतीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. गेल्या काही महिन्यांपासून हे पद रिक्त होतं. आता मुंबईकर अजित आगरकरकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजित आगरकरने काही दिवसांपूर्वीच आयपीएलमधील संघ दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. आता तो नवी जबाबदारी पेलताना दिसणार आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वातील निवड समितीत शिव सुंदर दास, सुब्रोतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरत यांचा समावेश असेल.
४५ वर्षीय आगरकरकडे २६ कसोटी, १९१ एकदिवसीय आणि ४ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. अजित आगरकरच्या नावावर २६ कसोटी सामन्यात ५९ बळी आहेत. तर १९१ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने २८८ बळी घेतले आहेत. याशिवाय ४ टी२० सामन्यात त्याने ३ बळी घेतले आहेत. यासह अजित आगरकरने आयपीएलच्या ४२ सामन्यांमध्ये २९ फलंदाजांना बाद केलं. दुसरीकडे, अजित आगरकरच्या कसोटी फॉरमॅटमध्ये फलंदाजीबद्दल बोलायचे तर या खेळाडूने १६.७९ च्या सरासरीने ५७१ धावा केल्या आहेत. तर १९१ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने १४.५९ च्या सरासरीने १,२६९ धावा जमवल्या. अजित आगरकर हा इंग्लंडमधल्या ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानात कसोटी सामन्यात शतक झळकावणाऱ्या १० दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम अजित आगरकरच्याच नावावर आहे. अजितचा हा विक्रम गेल्या २३ वर्षांपासून अबाधित आहे. २००० साली झिम्बाब्वेविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात त्याने २१ चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.





