मुंबई : उल्हासनगर येथील गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाची घटना ताजी असतानाच मुंबईतील दहिसर भागात भयानक घटना घडली. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांची दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. हीच बाब लक्षात घेता मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील शस्त्र परवानाधारकांची कुंडली काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. तसेच त्यांच्याकडे असलेल्या शस्त्र परवान्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच बोगस शस्त्र परवाने बाळगणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्यात यावी, असेही आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईत तब्बल ११ हजार ५०० जणांकडे शस्त्र परवाना आहे. या परवान्यांची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या राजकीय व्यक्ती, व्यावसायिक तसेच सुरक्षारक्षक यांची माहिती जमा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर परवानाधारक मंडळींचे कुणाशी वाद आहेत का? ते सध्या काय करतात? ते स्वतः कुठल्या तणावात आहेत का? अशा विविध गोष्टींचा आढावा देखील पोलिसांकडून घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. इतकंच नाही, तर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी गस्तीवर असलेल्या पोलिसांना दक्ष राहून सर्व राजकीय घडामोडी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्याचबरोबर उत्तरप्रदेश, बिहारमधून मुंबईत गावठी कट्टे आणून विकणाऱ्यांची कुंडलीही काढली जाणार आहे.





