पुणे : केंद्र सरकारने देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी पीएम राष्ट्रीय कृषी विकास योजना (पीएम – आरकेव्हीवाय) आणि कृषीउन्नती योजना (केवाय) या १,०१,३२१.६१ कोटी रुपयांची तरतुद असलेल्या योजनांना मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषी उन्नती योजनेला मंजुरी दिली आहे. दोन्ही योजनेसाठी एकूण १,०१,३२१.६१ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. या रक्कमेत केंद्र सरकारचा वाटा ६९,०८८.९८ कोटी रुपये आणि राज्य सरकारांचा वाटा ३२,२३२.६३ कोटी रुपये इतका असेल. पीएम – आरकेव्हीवाय योजनेसाठी ५७,०७४.७२ कोटी आणि कृषीउन्नती योजनेसाठी (केवाय) ४४,२४६.८९ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.





