नवी मुंबई : केवळ समाज माध्यमातील जाहिरातीला भुलून एका महिलेने सट्टा बाजारात तब्बल १ कोटी ७ लाख ९ हजार रुपयांची टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केली. मात्र परतावा मिळालाच नाही शिवाय ज्यांच्या सल्ल्याने पैसे गुंतवले त्यांची पैशांची मागणी संपत नसल्याने शेवटी याबाबत सायबर पोलीस ठाण्यात अज्ञान व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर येथे राहणाऱ्या एका महिलेस सट्टा बाजारात पैसे गुंतवा भरघोस परतावा मिळावा अशा आशयाची जाहिरात समाज माध्यमात पाहण्यात आली. सुरुवातीला दुर्लक्ष केले मात्र कुतुहूल म्हणून त्यांनी त्या जाहिरातीवर क्लिक केले. त्यांचा समावेश तात्काळ एका व्हॉट्सॲप समूहात करण्यात आला. त्या ठिकाणी सट्टा बाजारातील उलाढाली त्याची चर्चा, प्रश्नोत्तरे असे चालत होते. त्यात अनेकजण त्यांना भरपूर परतावा मिळाला असे सांगत असल्याने आपणही पैसे गुंतवावे या विचाराने त्यांनी त्या व्हॉट्सॲप समूह प्रशासकाला विचारणा केली. त्यांनी तात्काळ त्यांना एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. या ॲपमध्ये तुम्ही किती पैसे गुंतवले आणि त्याचा परतावा किती मिळाला हे पाहू शकत होते. फिर्यादी महिलेने सुरुवातीला काही पैसे गुंतवले, त्यांना चार दिवसांत दीडपट परतावा मिळाला. त्यामुळे त्यांनी थोडे थोडे करत पन्नास लाखांपेक्षा अधिक रुपये गुंतवले. मात्र परतावा मिळत नसल्याने त्यांनी याबाबत समूह प्रशासकास विचारणा सुरु केली. त्यांनी विविध कर, सांगत अजून पैशांची मागणी सुरु केली. त्यांनी भरलेल्या पैशांपेक्षा तिप्पट परतावा त्या ॲपमध्ये दिसत असल्याने त्या पैसे भरत गेल्या मात्र दिसणारा परतावा त्यांच्या बँक खात्यात मात्र जमा होत नव्हता. अशा पद्धतीने १३ फेब्रुवारी ते १५ मेच्या दरम्यान तब्बल १ कोटी ७ लाख ९ हजार रुपयांची टप्प्या टप्प्याने गुंतवणूक केली. मात्र परतावा मिळाला नाहीच, त्यामुळे त्यांनी नेरुळ सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. या अर्जाची दखल घेत अज्ञात सहा जणांच्या विरोधात संगनमत करून फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





