मुंबई : मालाड पोलिसांनी बोरिवलीतील एका व्यावसायिकाला खंडणीसाठी बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या २ आरोपीना अटक केली आहे. राहुल निर्मल (२२) आणि रवी राजपूत (२१) अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही फतेहपूर, उत्तर प्रदेशातील आहेत. या आरोपींनी एका व्यावसायिकाला खंडणीची धमकी देत ७ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. बदल्यात ३६ तासांत पैसे न दिल्यास व्यापारी आणि त्याच्या मुलाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. त्यांनी त्यांच्या कार्यालयात संभाव्य बॉम्बस्फोटाचा इशारा दिला. आरोपीला रायगडमधील जांभिवली परिसरातून अटक करण्यात आली. रवी राजपूत हा व्यावसायिकाच्या गोदामात काम करत असून त्याची आर्थिक परिस्थिती हलाकीची होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी तक्रारदार दीपक शर्मा हे व्यापारी असून मालाड (पश्चिम) येथील सुंदर नगर येथे वास्तव्यास आहेत. युनायटेड सेफ ट्रान्सपोर्ट कंपनी शर्मा यांच्या मालकीची आहे. त्यांचे कार्यालय गोरेगाव (पश्चिम) येथील टोपीवाला थिएटर परिसरात स्थित आहे. आरोपीने शर्मा यांच्या घराची आणि कार्यालयाची रेकी केली होती. त्यांच्या संदर्भात माहिती गोळा केली. शर्मा यांचा मोबाईल क्रमांक आरोपींनी मिळवत त्यांना धमकी देत त्यांच्या कुटुंबासोबतचा एक फोटोही पाठवला. अखेर, शर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली, त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध मालाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या लोकेशनची माहिती मिळवली . माहिती आधारे दोन्ही आरोपींना पोलिसांनी रायगड जिल्ह्यातून अटक करण्यात आली.





