मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली उभी फूट सध्या महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात चर्चेली जात आहे. विशेष म्हणजे शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून असणारे काही जुणे-जाणते नेतेमंडळीही अजित पवारांबरोबर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एकीकडे शरद पवारांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करून पक्ष पुन्हा उभा करण्याचा निर्धार व्यक्त केला असताना दुसरीकडे ही सगळी खेळी खुद्द शरद पवारांचीच असल्याचा अप्रत्यक्ष दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना राज ठाकरेंनी रविवारी घडलेल्या राजकीय घडामोडींवर थोडक्यात भाष्य केले. दिवसेंदिवस राजकारण किळसवाणे झाले आहे. या लोकांना मतदारांशी काहीही देणं-घेणं नाही. कुठल्या पक्षाचे मूळ मतदार का त्यांचे मतदार होते याचा सगळ्यांना विसर पडला आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी वाट्टेल त्या तडजोडी करायच्या याचे महाराष्ट्रात पेव फुटले आहे. लोकांनी याचा गांभीर्यानं विचार करणे गरजेचे झाले आहे. येत्या काही दिवसांत मी यावर सविस्तर भूमिका मांडेन. काही दिवसांत माझा महाराष्ट्र दौरा सुरू होणार आहे. त्यावेळी मी लोकांची भेट घेईनच, असे राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मनसे लोकसभा निवडणुकीच्या कामलाा लागली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे घडतंय त्याबद्दल लोकांच्या मनात चीड असल्याचे राज ठाकरे यांचे मत आहे. आता पक्षाला न भूतो न भविष्यती अशी संधी आहे. मतदार मनसेला भरभरून मतदान करतील असा राज ठाकरेंचा अंदाज आहे. त्यामुळे राज ठाकरे लवकरच पक्षाचा मेळावा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणातील घडोमोडींवर सविस्तर भूमिका मांडणार आहेत.





