मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड फसले असते तर एकनाथ शिंदे यांनी डोक्यात गोळी झाडून स्वत:ला संपवलं असतं, असा गौप्यस्फोट दिपक केसरकर यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला २० जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षपूर्तीच्या दिवशीच दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काही दिवसांमध्ये पडसाद पडण्याची शक्यता आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात हे सुध्दा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी जे काही केले ते महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी केलेले आहे. गद्दार कुणाला म्हणता असा सवाल करत ते म्हणाले की मी असा मनुष्य बघितला नाही. मी आजपर्यंत मीडियासमोर कधी बोललो नव्हतो. माझे एकनाथ शिंदे यांच्यासोबत अत्यंत जवळचे संबंध आहेत. ते समजा रागावून निघून गेले होते, तरी त्यांनी परत येण्याची तयार देखील दाखवलेली होती, असेही दिपक केसरकर म्हणाले.
महाराष्ट्राच्या जनतेने एक गोष्ट लक्षात ठेवावी. एकनाथ शिंदे हे खरे शिवसैनिक आहेत. ते सच्चे मनुष्य आहेत. त्यांनी काय सांगितलं, ते म्हणाले होते की मला ज्यावेळेला असं वाटलं असतं की मी केलेला हा उठाव यशस्वी होणार नाही तेव्हा मी सर्व आमदारांना परत पाठवलं असतं. मी एक फोन केला असता आणि म्हणालो असतो की, माझी चूक झालेली आहे. पण यामध्ये या लोकांची चूक नाही आणि तिथेच मी माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती, असे दिपक केसरकर यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांनी १९ जून २०२२ ला वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात “आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको”, असे शिंदेना उद्देशून म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या याच वक्तव्याची दिपक केसरकर यांनी आठवण यावेळी करुन दिली. एकनाथ शिंदे यांचा ज्यादिवशी अपमान झाला तो दिवस सुद्धा वर्धापन दिनाचा होता. वर्धापन दिनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या सगळ्यात एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला. त्यांचा अत्यंत अपमान केला. त्यांना खालची वागणूक दिली. ते आमचे विधीमंडळ नेते होते. त्यांचा अपमान तुम्ही का केला? याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे”, असेदी दिपक केसरकर म्हणाले.





