मुंबई : मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि संशोधनाचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांना नवे बळ देणारा महत्त्वपूर्ण टप्पा गाठत युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (यूडब्ल्यूए) इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर रॉजर कूक, यूडब्ल्यूएच्या चॅन्सलर डॉ. डायन स्मिथ-गँडर, कुलगुरू प्रा. अमित चकमा, विद्यापीठाचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियातील अग्रगण्य संशोधनाधिष्ठित विद्यापीठाने भारतातील आपला पहिला कॅम्पस मुंबईत सुरू करण्याचा निर्णय घेतला, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ‘ग्रुप ऑफ एट’मधील भारतात कॅम्पस सुरू करणारे यूडब्ल्यूए हे पहिले विद्यापीठ ठरले असून, हा निर्णय मुंबईच्या वाढत्या जागतिक महत्त्वाची आणि शैक्षणिक क्षमतेची साक्ष देणारा आहे. मुंबई ही देशाची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजनाची राजधानी असली तरी भविष्यात तिला जागतिक ज्ञान आणि नवोपक्रमाचे केंद्र बनविण्याचे राज्य शासनाचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी विकसित होत असलेल्या ‘मुंबई ३.०’ प्रकल्पांतर्गत एज्युकेशन सिटी, मेडी-सिटी, इनोव्हेशन सिटी, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर, संशोधन केंद्रे आणि उद्योगाभिमुख परिसंस्था उभारण्याचे काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मुळे भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रात मोठे बदल झाले असून आता जगातील नामांकित विद्यापीठे भारतात येत असल्याने विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देशातच उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की, यूडब्ल्यूएच्या मुंबई कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण घेण्याबरोबरच देशातील वित्तीय संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या, स्टार्टअप्स, तंत्रज्ञान उद्योग आणि संशोधन क्षेत्राशी थेट जोडले जाण्याची संधी मिळणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, आरोग्य सेवा, क्रिटिकल मिनरल्स, स्वच्छ ऊर्जा, शाश्वत विकास आणि प्रगत उत्पादन तंत्रज्ञान अशा भविष्योन्मुख क्षेत्रांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात संयुक्त संशोधन व शैक्षणिक सहकार्य वाढावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडे उत्कृष्ट संशोधन क्षमता असून महाराष्ट्राकडे प्रतिभावान मनुष्यबळ आणि मोठ्या संधी उपलब्ध असल्याने दोन्ही प्रदेशांमधील ज्ञानाधिष्ठित भागीदारी भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांना अधिक बळ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यूडब्ल्यूए हे महाराष्ट्राच्या विकासप्रवासाचे महत्त्वाचे भागीदार असून राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर रॉजर कूक यांनी हा कॅम्पस भारत आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंधांतील ऐतिहासिक टप्पा असल्याचे सांगत शिक्षण, संशोधन, उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. चॅन्सलर डॉ. डायन स्मिथ-गँडर यांनी मुंबई आणि चेन्नई कॅम्पससाठी सुमारे ८० दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती देत भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे नमूद केले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यूडब्ल्यूएने तीन भारतीय विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती जाहीर केल्याचे स्वागत केले. त्यामुळे परदेशी शिक्षणासाठी होणारा परकीय चलनाचा खर्च वाचेल आणि संशोधनाधारित शिक्षणामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. राज्यातील विविध विद्यापीठांचे कॅम्पस ‘एज्युकेशन सिटी’मध्ये उभारले जात असून भविष्यात तेथे सुमारे एक लाख विद्यार्थी शिक्षण घेतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.






