अलिबाग : पावसाळ्यामुळे बंद असलेली मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानची फेरीबोट जलवाहतूक सेवा अखेर १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने या सेवेला परवानगी दिल्याने मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील प्रवासी तसेच पर्यटन व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईला जोडणारा सर्वांत जवळचा आणि वेळेची बचत करणारा हा जलमार्ग दरवर्षी पावसाळ्यात सुमारे तीन महिने बंद ठेवला जातो. त्यामुळे या कालावधीत पर्यटन व्यवसायावर परिणाम होत असतो. सेवा पुन्हा सुरू होत असल्याने अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन परिसरातील पर्यटनाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या मार्गावर पीएनपी, मालदार, अजंठा आणि अपोलो या कंपन्यांच्या प्रवासी फेरीबोटी नियमितपणे सेवा देतात. मांडवा बंदरातून साधारण प्रत्येक अर्ध्या तासाने फेरीबोट सुटते, तर प्रवाशांची गर्दी वाढल्यास अतिरिक्त फेऱ्याही सोडल्या जातात. स्पीडबोट आणि रो-रो सेवांच्या तुलनेत फेरीबोटचा प्रवास अधिक किफायतशीर असल्याने सर्वसामान्य प्रवासी या सेवेचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. दरवर्षी सुमारे १५ लाख प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, खड्डे आणि प्रदूषण टाळण्यासाठी अलिबाग आणि मुरुड परिसरातील अनेक प्रवासी मुंबईला जाण्यासाठी फेरीबोटीलाच प्राधान्य देतात.
मुंबईतील पर्यटकांसाठीही हा जलमार्ग विशेष आकर्षणाचा मानला जातो. गेटवे ऑफ इंडियाचा नयनरम्य परिसर, समुद्रातील प्रदूषणमुक्त प्रवास, वाटेत दिसणारे सीगल पक्षी आणि जलप्रवासाचा वेगळा अनुभव यामुळे अनेक पर्यटक या मार्गाची निवड करतात. कमी खर्चात सुखद प्रवासाचा अनुभव देणारा हा मार्ग पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. त्यामुळे सेवा पुन्हा सुरू होताच पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. मेरीटाईम बोर्डाने दिलेल्या परवानगीनुसार १ सप्टेंबरपासून मध्यम आकाराच्या फेरीबोटी या मार्गावर दिवसा नियमित धावणार आहेत. मात्र, प्रतिकूल हवामान निर्माण झाल्यास सेवा परिस्थितीनुसार नियंत्रित केली जाईल. फेरीबोट सेवा सुरू करण्यापूर्वी सर्व नौकांची आवश्यक डागडुजी, तांत्रिक तपासणी आणि सुरक्षा उपकरणांची पाहणी करण्याच्या सूचना संबंधित कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षित आणि सुरळीत जलवाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. पर्यटन हंगामाच्या प्रारंभीच सेवा सुरू होत असल्याने रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






