नाशिक : त्र्यंबकेश्वर परिसरातील प्रसिद्ध आणि आव्हानात्मक हरिहर गडावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पूर्णवेळ प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी गड परिसरात सतत दाट धुके, निसरड्या दगडी पायऱ्या आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र कार्यालयाने हा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून पुढील आदेश येईपर्यंत पर्यटकांना गडावर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. हरिहर गडावरील सुमारे ८० अंशांच्या उभ्या दगडी पायऱ्यांवर शेवाळ साचल्याने घसरून खोल दरीत पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच गड परिसरात अचानक दाट धुके पसरत असल्याने दृश्यमानता अत्यंत कमी होत असून चढाई आणि उतरणे दोन्ही धोकादायक ठरत आहे. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणारे भाविक आणि शनिवार-रविवारी ट्रेकसाठी येणाऱ्या हजारो पर्यटकांमुळे गर्दीत आणखी भर पडत होती. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गड पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी परिस्थितीनुसार काही वेळ प्रवेश रोखणे किंवा पर्यटकांना टप्प्याटप्प्याने गडावर सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र वाढती गर्दी आणि मर्यादित मनुष्यबळामुळे प्रभावी नियंत्रण ठेवणे कठीण होत असल्याने आता थेट पूर्णवेळ प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी हवामान सध्या गिर्यारोहणासाठी अजिबात अनुकूल नसल्याचे सांगत पर्यटकांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे आणि जीव धोक्यात घालून गडावर जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे. हरिहर गडासह रामशेज, ब्रह्मगिरी आणि अंजनेरी या गडांवरही सध्या पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र हरिहर गडाची उभी आणि अत्यंत अवघड रचना लक्षात घेता येथे अपघाताचा धोका अधिक असल्याने सर्वप्रथम या गडावर प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि हवामान अनुकूल झाल्यानंतरच प्रवेश पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.






