मुंबई : मलबार हिल येथील पुनर्बांधणी करण्यात आलेल्या हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. राज्यात येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, परदेशी शिष्टमंडळे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या निवासासाठी हे अतिथीगृह सुसज्ज करण्यात आले आहे. आधुनिक सुविधा, सुरक्षितता आणि उच्च दर्जाच्या आदरातिथ्य व्यवस्थेमुळे राज्याच्या अतिथ्य व्यवस्थेला अधिक बळ मिळणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार विश्वजित कदम तसेच मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मलबार हिल परिसरातील या नव्या राज्य अतिथीगृहामध्ये एकूण ५७ सुसज्ज कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये ६ व्हीव्हीआयपी आणि ५१ इतर कक्षांचा समावेश आहे. तळमजला अधिक आठ मजले अशा स्वरूपात अतिथीगृहाची रचना करण्यात आली असून, मान्यवरांच्या निवासासाठी आवश्यक सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी अतिथीगृहाची पाहणी करून तेथील विविध सुविधांची माहिती घेतली. देश-विदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या मान्यवरांना दर्जेदार आणि सुरक्षित निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी हे अतिथीगृह महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्याच्या राजशिष्टाचार व्यवस्थेच्या दृष्टीनेही या अतिथीगृहामुळे महत्त्वाची सुविधा उपलब्ध झाली असून, भविष्यात विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाहुण्यांच्या निवासाची व्यवस्था अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.





