मुंबई : पावसाळा सुरू होताच मुंबईकरांसमोर रस्त्यांवरील पाणी तुंबणे, खड्डे आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांबरोबरच उघड्या मॅनहोलचा गंभीर धोका पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी साकीनाका परिसरात ५५ वर्षीय व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्यानंतर या प्रश्नाची तीव्रता अधिक अधोरेखित झाली आहे. या घटनेनंतरही मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तब्बल ८ हजार मॅनहोलवर अद्याप संरक्षक लोखंडी जाळ्या बसवण्यात आलेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पावसाच्या काळात रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या या परिस्थितीमुळे पालिका प्रशासनाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेषतः मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्यानंतर उघडे मॅनहोल दिसून न आल्याने अपघात होण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे या कामात होणारा विलंब मुंबईकरांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
उघड्या मॅनहोलच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने २०२३ आणि २०२४ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेला सर्व मॅनहोलवर मजबूत संरक्षक जाळ्या बसवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतर मलनि:सारण आणि पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत वॉर्डस्तरावर काम सुरू करण्यात आले. मात्र विविध रस्ते विकास कामांदरम्यान काही मॅनहोल बुजवण्यात आले, तर अनेक ठिकाणी आवश्यक संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम अपूर्णच राहिले. उपलब्ध आकडेवारीनुसार मुंबई शहरात एकूण १,०३,९२६ मॅनहोल असून त्यापैकी मलनि:सारण विभागाच्या ७५,१२९ मॅनहोलपैकी ६३,६०० मॅनहोलवरच संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. सुमारे ३,०५८ मॅनहोल रस्त्यांच्या कामांमुळे बंद करण्यात आले असून उर्वरित सुमारे ८ हजार मॅनहोल अजूनही जाळ्यांशिवाय आहेत. हे काम ३१ मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असतानाही ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या संथ गतीबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. साकीनाका दुर्घटनेनंतर तरी उर्वरित सर्व मॅनहोल सुरक्षित करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील का, असा प्रश्न मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे.






