पुणे : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरण सेवा’ उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचे सांगत अशा सेवाकार्यात सहभागी होणे हे मोठे भाग्य असल्याची भावना व्यक्त केली. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे दर्शन घेऊन तसेच त्यांचा आशीर्वाद घेऊन या सेवाकार्यात सहभागी होत असल्याचा विशेष आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. आषाढी वारीत सहभागी होणारे लाखो वारकरी भगिनी-बंधू अनेक दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपुरात पोहोचतात. या प्रदीर्घ प्रवासामुळे त्यांना शारीरिक थकवा जाणवतो. अशा वेळी त्यांच्या पायांची सेवा करून त्यांचा शीण दूर करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारा ‘चरण सेवा’ उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. वारकरी संप्रदायात प्रत्येक व्यक्तीमध्ये माऊलीचे दर्शन घेतले जाते आणि एकमेकांच्या चरणी नम्रतेने वंदन करण्याची परंपरा समता, नम्रता आणि भक्तीचा संदेश देणारी आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या चरणांची सेवा करण्याची संधी मिळणे हे स्वतःसाठी मोठे भाग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. विठुरायाच्या भक्तांची सेवा हीच खरी विठ्ठलभक्ती असल्याचे सांगत त्यांनी या सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या तरुण स्वयंसेवकांनी अत्यंत समर्पित भावनेने वारकऱ्यांची सेवा केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच या सेवाकार्यात योगदान देणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते आणि आयोजकांचे अभिनंदन करत आमदार सुनील कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत आधुनिक पद्धतीच्या चरण सेवा यंत्रांचीही उपलब्धता करून देण्यात आली असून त्याद्वारे वारकऱ्यांना अधिक प्रभावी आणि दर्जेदार सेवा मिळत आहे. गेल्या काही वर्षांत आषाढी वारीच्या व्यवस्थापनात अनेक सकारात्मक बदल करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. वारकऱ्यांच्या सोयीसाठी जर्मन हँगरची व्यवस्था, ‘निर्मल वारी’ अभियान, अधिक प्रशस्त पालखी मार्ग अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व उपाययोजनांमुळे वारीचे व्यवस्थापन अधिक सक्षम, सुरक्षित आणि सुकर झाले असून वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय येत्या दोन ते तीन वर्षांत पंढरपूर कॉरिडॉरचे काम पूर्ण करण्याचा शासनाचा मानस असल्याची माहिती देताना त्यांनी भविष्यात पंढरपूरचा विकास काशी, अयोध्या आणि उज्जैनप्रमाणे आदर्श धार्मिक क्षेत्र म्हणून करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. धार्मिक पर्यटन, पायाभूत सुविधा आणि वारकऱ्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधांचा विकास यावर विशेष भर दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील कांबळे, हेमंत रासने यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या सेवेसाठी कार्यरत स्वयंसेवकांचे कौतुक केले आणि वारकरी परंपरेतील सेवा, समता आणि भक्तीची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे अधोरेखित केले.






