मुंबई : मुंबईतील समुद्रकिनारे हे नेहमीच नागरिक आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील काही समुद्रकिनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर शेकडो नागरिक अंथरूण-पांघरूण घेऊन झोपण्यासाठी येत असल्याचे दिसून येत आहे. रात्री उशिरापर्यंत किनाऱ्यावर कुटुंबांसह आलेले नागरिक मोठ्या संख्येने विश्रांती घेताना दिसत असल्याने हा विषय सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. अनेकांनी यापूर्वी अशा प्रकारे समुद्रकिनाऱ्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक झोपण्यासाठी येत नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे हे लोक समुद्रकिनाऱ्यावर का येत आहेत, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
वर्सोवा किनाऱ्यावर रात्रीच्या वेळी दिसणारी ही गर्दी प्रामुख्याने वाढत्या उष्णतेशी संबंधित असल्याचे मानले जात आहे. मुंबईत सध्या प्रचंड उकाडा आणि दमट वातावरण जाणवत असून, लांबलेल्या मान्सूनमुळे नागरिकांना अपेक्षित दिलासा मिळालेला नाही. दिवसभराच्या उष्णतेनंतरही रात्री तापमानात फारशी घट होत नसल्याने अनेकांना घरात अस्वस्थ वाटत आहे. समुद्रकिनाऱ्यावरील थंड वाऱ्यामुळे काही प्रमाणात आराम मिळत असल्याने अनेक कुटुंबे रात्री समुद्रकिनारी येत असल्याचे बोलले जात आहे. परिणामी, वर्सोवा किनाऱ्यावर रात्रीच्या वेळी अक्षरशः दाटीवाटीने नागरिक झोपलेले दिसत आहेत. काही जण कुटुंबासह, तर काही मित्रपरिवारासोबत किनाऱ्यावर रात्र घालवत असल्याचे चित्र आहे. मुंबईत यंदा हवामान बदलाचे परिणाम अधिक तीव्रपणे जाणवत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शहर आणि उपनगरांमध्ये दीर्घकाळापासून उष्ण व दमट हवामान कायम असून तापमानाचा पारा सातत्याने उच्च पातळीवर आहे. दिवसा उन्हाचा तडाखा सहन करावा लागत असतानाच रात्रीही उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या आठवड्यात कुलाबा येथे मागील ५७ वर्षांतील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद झाली होती. तेथे किमान तापमान ३०.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते, जे अत्यंत असामान्य मानले जाते. तसेच आजही कुलाबा आणि सांताक्रूझ येथे २९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. सामान्यतः रात्री तापमानात घट होऊन काहीसा गारवा जाणवतो, मात्र सध्या परिस्थिती वेगळी असल्याने नागरिकांना उष्णतेचा त्रास अधिक सहन करावा लागत आहे. दरम्यान, समुद्रकिनाऱ्यांवर वाढणारी गर्दी ही केवळ उष्णतेमुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेचे प्रतीक नसून हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांचीही झलक असल्याचे मानले जात आहे. आगामी काळात मान्सून सक्रिय झाल्यास नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मुंबईकर उकाड्यापासून बचाव करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यांचा आधार घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.







