नवी दिल्ली : राजधानीतील वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली अग्निशमन विभागाने प्रत्येक घरात धूर शोधक आणि पाण्याच्या फवारा यंत्रणा बसविणे सक्तीचे करण्याची शिफारस केली आहे. विभागाच्या मते, या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास आगीमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात तब्बल ९७ टक्क्यांपर्यंत घट घडवून आणता येऊ शकते. पुढील २५ वर्षांचा विचार करून आग प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्यात आला असून तो लवकरच गृह विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. विवेक विहार येथील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अग्निसुरक्षेसाठी व्यापक धोरण तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अग्निशमन विभागाने अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचविल्या आहेत. दिल्लीचे मुख्य अग्निशमन अधिकारी ए. के. मलिक यांनी सांगितले की, भविष्यातील आगीच्या घटनांमध्ये जीवितहानी कमी करण्यासाठी घरांमध्ये धूर शोधक आणि फवारा यंत्रणा अनिवार्य करण्यावर भर देण्यात आला आहे.
याशिवाय इमारतींमधील जिन्यांच्या परिसरात वीज मीटर बसविण्यावर निर्बंध घालणे तसेच तळमजला किंवा वाहनतळातील आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गांजवळ विद्युत वाहनांच्या विद्युतभरण केंद्रांना परवानगी न देण्याची शिफारस करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, अनेक आगीच्या घटना वीज मीटर किंवा विद्युतभरण केंद्रांमुळे घडत असून त्यामुळे आग लागल्यानंतर नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर पडणे कठीण जाते. आधीच बांधलेल्या घरांमध्ये धूर शोधक बसविण्यासाठी प्रोत्साहनपर योजना राबविण्याचाही प्रस्ताव आहे. धूर शोधक आणि फवारा यंत्रणेमुळे आग लागल्याची माहिती तत्काळ मिळून नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यास वेळ मिळतो, तसेच आग नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. दिल्लीत दरवर्षी आगीच्या घटनांमुळे सुमारे १०० जणांचा मृत्यू होत असल्याचे सांगितले जाते. यंदा जानेवारी ते जून या कालावधीतच आगीमुळे ६६ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याने अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांची गरज अधिक अधोरेखित झाली आहे.






