मुंबई : आषाढी वारीच्या पवित्र परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत राज्यातील पालखी मार्गांचे व्यापक हरितीकरण करण्यासाठी राज्य शासनाने मोठा पुढाकार घेतला आहे. शासन, आध्यात्मिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून हा उपक्रम लोकचळवळीच्या स्वरूपात राबविण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिले. ‘निर्मल वारी आणि हरित वारी’ उपक्रमाच्या आढावा बैठकीत पालखी मार्गांवरील वृक्षारोपण, संवर्धन आणि हरित पट्टे विकसित करण्याच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संत तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे यांनी पालखी मार्गांवर वृक्ष संवर्धनासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी केलेली विनंती लक्षात घेऊन ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांवर वारकऱ्यांना उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणावर सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
यावेळी पालखी मार्गांच्या हरितीकरणासाठी विविध अभिनव कल्पनांवरही चर्चा झाली. क्रिकेट सामन्यांदरम्यान पडणाऱ्या प्रत्येक निर्धाव चेंडूमागे एक वृक्ष लावण्याचा उपक्रम राबविणाऱ्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या माध्यमातूनही वृक्षलागवडीला चालना देण्याची सूचना करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ३०० कोटी वृक्ष लागवड अभियानाशीही हा उपक्रम जोडण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. मंत्री शेलार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पालखी मार्गांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. पायाभूत सुविधा उभारताना तोडल्या जाणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात करण्यात येणारी वृक्षलागवडही पालखी मार्गांवर केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले. देशी वृक्षांच्या संवर्धनासोबत त्यांची नियमित देखभाल, पाणीपुरवठा आणि संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. या उपक्रमामुळे वारकऱ्यांना पायी वारीदरम्यान अधिक सुखद अनुभव मिळणार असून पर्यावरण संरक्षणालाही मोठी चालना मिळेल. वारकरी परंपरा, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभाग यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला.







