मुंबई : सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात यावा. मात्र, हा प्रकल्प राबविताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्ये यांना केंद्रस्थानी ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात धारावी पुनर्विकास प्रकल्पाची आढावा बैठक झाली. बैठकीस मुंबईच्या महापौर रितू तावडे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव अदानी, अनिल सरदाना यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, धारावी पुनर्विकास हा केवळ इमारती उभारण्याचा कार्यक्रम नसून धारावीकरांच्या सर्वांगीण विकासाचा उपक्रम आहे. त्यामुळे व्यावसायिक विकासापेक्षा लोकहितालाच सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. कुंभारवाडा हा धारावीच्या सांस्कृतिक आणि पर्यटन वारशाचा महत्त्वाचा भाग असल्याने त्याचे वैशिष्ट्य जपण्यासाठी योग्य तोडगा काढण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रकल्पात ‘नेचर पार्क’ची संकल्पना प्रत्यक्षात आणून झाडांचे पुनःरोपण व नवीन झाडे लावण्याचे नियोजन केले जाईल. सर्व परवानग्या जलदगतीने मिळण्यासाठी एक विशेष कक्ष (सिंगल विंडो) निर्माण करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम मार्च २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, पहिल्या टप्प्यात किमान १० हजार घरे नागरिकांना दिली जातील. धारावीतील पुनर्वसन इमारतींचे काम ४२ महिन्यांत, तर माटुंगा परिसरातील काम ३९ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पात्र रहिवाशांना नव्या घरांमध्ये स्वतंत्र स्वयंपाकघर, शयनकक्ष, स्वच्छतागृहे, नैसर्गिक प्रकाश आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सुविधा असेल. धारावीतील चामडे, वस्त्रनिर्मिती, पुनर्वापर, मातीची भांडी आणि खाद्यपदार्थ या प्रमुख लघुउद्योगांच्या संरक्षणासाठी विशेष ‘एमएसएमई’ योजना तयार केली जात आहे. खाद्यपदार्थ उद्योगांसाठी आधुनिक ‘क्लाऊड किचन’ संकल्पना विकसित केली जाणार आहे.
या प्रकल्पांतर्गत धारावीत देशातील पहिला अत्याधुनिक ट्रान्सपोर्ट हब उभारला जाईल.
• कनेक्टिव्हिटी: पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेसह विविध मेट्रो मार्ग येथे जोडले जातील. भविष्यात बुलेट ट्रेन जोडण्याचाही विचार आहे.
• सिटी चेक-इन: विमान प्रवाशांसाठी धारावीतच सामानाची नोंदणी (Check-in) करून एअरपोर्ट एक्सप्रेसने विमानतळावर जाता येईल.
• हवाई टॅक्सी आणि जलमार्ग: विमानतळापर्यंत जलवाहतुकीसाठी फास्ट जेट्टी आणि हवाई टॅक्सीसाठी ‘व्हर्टीपोर्ट’ विकसित केला जाईल.
याशिवाय, बीकेसी ते धारावी मार्गाचे सुशोभीकरण करून मध्यभागी हरित पट्टा आणि पदपथ विकसित केले जातील. यामुळे धारावी आणि बीकेसी परिसराला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरूप प्राप्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.






