मुंबई : बेस्ट उपक्रमातील १२ कामगार संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या कृती समितीने प्रशासनाला १८ जून २०२६ पर्यंत विविध प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याचा अल्टिमेटम दिला आहे. या मुदतीत समाधानकारक तोडगा न निघाल्यास १८ जूननंतर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा आजी आणि माजी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. आंदोलनाची पुढील दिशा आणि रणनीती निश्चित करण्यासाठी ८ जून दादर येथे बेस्टच्या आजी-माजी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. बेस्ट प्रशासन आणि राज्य सरकारकडून वारंवार आश्वासने मिळूनही अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधील असंतोष वाढत असून त्याचे रूप आता तीव्र आंदोलनात बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. संघटनांच्या मते, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न सोडवले नाहीत तर संपाशिवाय पर्याय उरणार नाही.
कामगार संघटनांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि इतर थकीत देणी तातडीने अदा करण्याची मागणी अग्रस्थानी आहे. याशिवाय बेस्टच्या परिवहन विभागात स्वतःच्या मालकीच्या बसांची संख्या कमी करून खाजगी कंत्राटी बस वाढवल्या जात असल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे. परिवहन आणि विद्युत विभागाची आर्थिक तसेच प्रशासकीय स्थिती खालावत चालल्याची चिंता व्यक्त करत रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनांच्या म्हणण्यानुसार, रिक्त पदे न भरता केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना बढती दिली जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. दरम्यान, हा संप प्रत्यक्षात झाल्यास मुंबईतील लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर मोठा परिणाम होऊ शकतो. विशेषतः कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असलेले नागरिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन आणि संघटनांमधील चर्चेकडे आता संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे.
कामगारांच्या ३ मुख्य मागण्या :
१. थकीत पैशांचे वाटप : गेल्या ४ ते ५ वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या सुमारे ४,००0 हून अधिक कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि पीएफची देणी तातडीने दिली जावीत.
२. अर्थसंकल्पाचे विलीनीकरण : बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुख्य अर्थसंकल्पामध्ये कायमस्वरूपी विलीन करण्यात यावा.
३. कंत्राटीकरण बंद करणे : भाडेतत्त्वावरील (खाजगी कंत्राटी) बसगाड्यांची सेवा बंद करून बेस्टने स्वतःच्या मालकीचा गाड्यांचा ताफा वाढवावा.







