मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने राज्यभर अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे. मुंबईतील परळ बसस्थानकात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत राज्यातील बसस्थानके, एसटी बस, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहे अधिक स्वच्छ, सुंदर आणि प्रवासी-अनुकूल बनविण्याचा संकल्प महामंडळाने केला आहे. कार्यक्रमादरम्यान स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक यंत्रसामग्रीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. राज्यभरातील प्रमुख बसस्थानके आणि त्यांचा परिसर अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने नियमित स्वच्छ करण्यात येणार असून बस, विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहांची दर चार तासांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज लाखो प्रवासी एसटी सेवेचा लाभ घेत असल्याने त्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही महामंडळाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमांतर्गत बसस्थानक परिसरात जमा होणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या वेगळ्या संकलित करून पुनर्वापरासाठी पाठविण्यात येणार आहेत. या प्रक्रियेतून विविध उपयुक्त आणि टिकाऊ उत्पादने तयार केली जाणार असल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली. स्वच्छता ही केवळ एकदिवसीय मोहीम नसून सातत्याने राबविण्याची प्रक्रिया असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तिच्या अंमलबजावणीवर नियमित देखरेख ठेवली जाणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी महामंडळाने राज्यातील सर्व २५१ आगारांमध्ये ई-बससाठी चार्जिंग स्थानकांचे जाळे उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार परळ आगारात विस्तारित नऊ चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचे भूमिपूजनही प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमानंतर त्यांनी बसस्थानक परिसर, प्रवासी प्रतीक्षागृह, प्रसाधनगृहे आणि इतर सुविधांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. या राज्यव्यापी मोहिमेमुळे एसटी स्थानकांच्या स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा होऊन प्रवाशांना अधिक चांगल्या आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.







