वृत्तसंस्था : उन्हाळा सुरू होताच भारतीयांच्या घराघरात आंब्याचा सुगंध दरवळू लागतो. हापूस, केसर, लंगडा यांसारख्या आंब्यांची गोडी आणि सुगंध जगभर प्रसिद्ध असून भारतातून दरवर्षी अनेक देशांमध्ये आंब्यांची निर्यात केली जाते. मात्र यंदा भारतीय आंबा निर्यातीला मोठा धक्का बसला आहे. जपानने भारतीय आंब्यांच्या आयातीवर पुन्हा निर्बंध लागू केले असून त्यामुळे निर्यातदार आणि शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. जपानमधील Yokohama Plant Protection Association ने ३१ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या नोटिशीनुसार, २५ मार्च २०२६ नंतर जारी करण्यात आलेल्या तपासणी प्रमाणपत्रांसह भारतीय आंब्यांच्या शिपमेंटला प्रवेश दिला जाणार नाही. जपानी अधिकाऱ्यांनी भारतातील संबंधित निर्यात सुविधांमध्ये आवश्यक Operational Standards आणि Quarantine नियमांचे पालन होत नसल्याचे निरीक्षण नोंदवले असून सुधारणा होईपर्यंत ही बंदी कायम राहू शकते.
जपानमध्ये आंबा निर्यातीसाठी Vapour Heat Treatment (VHT) ही प्रक्रिया अनिवार्य आहे. या प्रक्रियेत नियंत्रित उष्ण आणि आर्द्र वातावरणाद्वारे Fruit Fly आणि इतर कीटक नष्ट केले जातात. यंदा उत्तर प्रदेशातील रेहमनपूर येथील सुविधेच्या तपासणीत Fumigation आणि Disinfection प्रक्रियेत काही त्रुटी आढळल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर जपानने हापूस, केसर, लंगडा, बंगनपल्ली यांसह विविध भारतीय आंब्यांच्या आयातीवर बंदी घातली. २०२५-२६ मध्ये भारतातून जपानला Fresh आणि Processed Mango Products ची निर्यात सुमारे १,५४ दशलक्ष डॉलर इतकी होती. जपान हा भारताचा सर्वात मोठा बाजार नसला तरी उच्च दर्जाच्या बाजारपेठेत भारतीय आंब्याला मिळालेल्या प्रतिष्ठेमुळे या निर्णयाला मोठे महत्त्व आहे. विशेष म्हणजे याआधीही भारतीय आंब्यांवर जवळपास दोन दशकांची बंदी होती, जी २२०६ मध्ये हटवण्यात आली होती. सध्या बंदी उठवण्याबाबत कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नसून भारताने आवश्यक सुधारणा केल्यानंतरच आयात पुन्हा सुरू करण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे जपानी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.







