मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ (अॅक्वा लाइन) मार्गिकेवरील प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भुयारी मेट्रोमध्ये मोबाइल नेटवर्क उपलब्ध नसल्याने निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आता या मार्गिकेवर मोबाइल नेटवर्क सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी मेट्रो-३ मार्गिकेवर दोन वेळा तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा काही काळ ठप्प झाली होती. सकाळी साडेआठ ते साडेनऊ आणि दुपारी पाऊण ते दीड या वेळेत सिग्नल यंत्रणेत त्रुटी निर्माण झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विशेषतः भुयारी बोगद्यात मोबाइल नेटवर्क नसल्यामुळे अनेक प्रवासी अस्वस्थ झाले होते. अडकलेल्या प्रवाशांना बाहेरील कुटुंबीयांशी संपर्क साधता न आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर Mumbai Metro Rail Corporation Limited (MMRCL) ने आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांना मेट्रो-३च्या भूमिगत स्थानकांमध्ये आणि बोगद्यांमध्ये दूरसंचार पायाभूत सुविधा उभारण्याची परवानगी दिली आहे. Bharti Airtel, Reliance Jio आणि Vodafone Idea या कंपन्यांना इन-बिल्डिंग सोल्यूशन्स प्रणाली उभारणे, तिचे संचालन आणि देखभाल करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या माध्यमातून प्रवाशांना अखंड व्हॉइस कॉलिंग आणि डेटा कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मोबाइल नेटवर्क सेवांबाबत काही काळ अनिश्चितता असली तरी आता लवकरच आवश्यक यंत्रणा उभारून सेवा सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास एमएमआरसीएलने व्यक्त केला आहे.







