मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना २००८ मधील बहुचर्चित रेल्वे नोकर भरती आंदोलन प्रकरणात मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. ठाणे सत्र न्यायालयाने गुरुवारी या प्रकरणी राज ठाकरे आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. तब्बल १८ वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. २००८ मध्ये रेल्वे भरती प्रक्रियेदरम्यान कल्याण रेल्वे स्थानक परिसरात परप्रांतीय, विशेषतः उत्तर भारतीय उमेदवारांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांच्या आंदोलनादरम्यान रेल्वे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले गेले होते. या हिंसाचारामागे राज ठाकरे यांच्या कथित प्रक्षोभक भाषणांची पार्श्वभूमी असल्याचा ठपका ठेवत तत्कालीन सरकारने त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात त्यांना अटकही करण्यात आली होती.
या खटल्याच्या अंतिम सुनावणीवेळी राज ठाकरे स्वतः न्यायालयात उपस्थित होते. मागील सुनावणीत जबाब नोंदवताना त्यांनी “या गुन्ह्याशी माझा कोणताही थेट संबंध नाही आणि आंदोलनाच्या वेळी मी नाशिक येथे होतो,” अशी भूमिका मांडली होती. निकालपत्रात न्यायालयाने सरकारी पक्षाच्या तपासातील त्रुटींवर स्पष्टपणे बोट ठेवले आहे. आरोपींचा या घटनेतील थेट सहभाग सिद्ध करणारा किंवा त्यांनी हिंसाचाराला चिथावणी दिल्याचे स्पष्ट करणारा कोणताही ठोस आणि वस्तुनिष्ठ पुरावा सरकारी पक्ष सादर करू शकला नाही, असे निरीक्षण मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवले. तसेच आरोपी घटनास्थळी उपस्थित असल्याचेही सिद्ध झाले नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या कारणांमुळे न्यायालयाने राज ठाकरे आणि इतर आरोपींना निर्दोष मुक्त करत मोठा दिलासा दिला आहे.







