मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली असून, अपात्र असतानाही योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या महिलांकडून दिलेली रक्कम वसूल केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. साम टीव्हीशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, लाभार्थींना ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता सर्व विभागांकडून डेटा मागवून तपासणी केली जाणार आहे. सरकारचा उद्देश पात्र महिलांना योजनांचा लाभ मिळवून देणे हा असला, तरी अपात्र लाभार्थ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तपासणीत काही पुरुषांनीही ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले असून, त्यांच्याकडूनही रक्कम वसूल केली जाणार आहे. दरम्यान, काही महिलांना दिलासाही मिळण्याची शक्यता आहे. आरटीओच्या डेटामध्ये वाहनधारक म्हणून नाव आल्यामुळे काही महिलांचे लाभ बंद करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या नावावर वाहन नसल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या आहेत. अशा महिलांनी आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सादर केल्यानंतर त्यांची पुन्हा पडताळणी करण्यात येणार असून, पात्र आढळल्यास त्यांचा लाभ पुन्हा सुरू केला जाईल, असे आदिती तटकरे यांनी सांगितले. सरकारकडून योजनेतील पारदर्शकता राखण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.







