मुंबई : राज्यात उद्या महाराष्ट्र दिन पासून १६ व्या राष्ट्रीय जनगणनेच्या प्रक्रियेला अधिकृत सुरुवात होत आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या मुख्य जनगणनेच्या पार्श्वभूमीवर ‘घर गणना’ हा पहिला टप्पा १ मे ते १५ मे २०२६ दरम्यान राबवण्यात येणार आहे. या कालावधीत जनगणनेचे अधिकारी नागरिकांच्या घरी भेट देऊन घरांची स्थिती, कुटुंबाची रचना आणि इतर मूलभूत माहिती संकलित करतील. जिल्हा प्रशासनांनी यासाठी आवश्यक तयारी पूर्ण केली असून, राज्याच्या प्रत्येक भागातील अचूक सांख्यिकीय माहिती गोळा करण्यावर भर दिला जाणार आहे. या टप्प्यानंतर १६ मे ते १४ जून दरम्यान घरांची अधिकृत नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे.
या जनगणनेत एकूण ३३ प्रश्नांच्या माध्यमातून नागरिकांकडून सविस्तर माहिती घेतली जाणार आहे. यामध्ये घराचे स्वरूप, कुटुंबातील सदस्यसंख्या, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि मालमत्तेशी संबंधित तपशीलांचा समावेश असेल. यंदाची जनगणना पूर्णतः डिजिटल पद्धतीने होणार असून, नागरिकांना प्रथमच ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. अधिकृत संकेतस्थळावर १६ भारतीय भाषांमध्ये माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. देशभरात सुमारे ३० लाखांहून अधिक गणक आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते मोबाईल ॲपच्या माध्यमातून रिअल-टाइम डेटा संकलित करतील. या डिजिटल प्रक्रियेमुळे माहिती संकलन अधिक वेगवान, अचूक आणि पारदर्शक होणार असून, भविष्यातील सरकारी धोरणे आणि संसाधनांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.







