नवी दिल्ली : वर्षभरापूर्वी काश्मीरमधील पहलगाम खोऱ्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून निर्दयीपणे गोळ्या झाडत २६ निष्पाप नागरिकांचा बळी घेतला होता. हा दिवस भारतासाठी अत्यंत दु:खद ठरला असून, या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आदरांजली अर्पण केली. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले की, “गेल्या वर्षी याच दिवशी पहलगाममध्ये झालेल्या भयानक हल्ल्यात प्राण गमावलेल्या निरपराध लोकांचे मी स्मरण करतो. त्यांचे बलिदान कधीही विसरले जाणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात संपूर्ण देश सहभागी आहे.”
पंतप्रधानांनी पुढे स्पष्ट केले की, भारत दहशतवादाविरुद्ध लढ्यात एकजुटीने उभा आहे आणि कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाला शरण जाणार नाही. “दहशतवाद्यांचे कोणतेही कट कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही,” असा ठाम इशाराही त्यांनी दिला. २२ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत ७ मे रोजी पहाटे लष्करी कारवाई केली होती. या मोहिमेद्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले. या प्रत्युत्तरामुळे दहशतवादी कारवायांना आळा बसला आणि देशाच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा पुनरुच्चार झाला. या घटनेनंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, भविष्यात अशा प्रकारच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना अधिक बळकट करण्यात येत आहेत.







