ठाणे : ठाणे शहरात कोकणातील मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास असूनही, राज्य परिवहन (एसटी) सेवेच्या अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः सण-उत्सवाच्या काळात वाढणारी गर्दी, तसेच प्रवासीसंख्या कमी असल्याचे कारण देत काही गाड्या बंद केल्या जात असल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा त्रास अधिकच वाढला होता. अशाच प्रकारे ठाणे ते शिंदी ही महत्त्वाची एसटी सेवा काही काळापूर्वी बंद करण्यात आली होती, ज्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी साधनांचा आधार घ्यावा लागत होता. या परिस्थितीमुळे ठाणेकरांमध्ये नाराजी निर्माण झाली होती आणि ही सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती.
दरम्यान, कोकण फर्स्ट फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश मिळत ही एसटी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी संतोष शांताराम निकम यांच्या नेतृत्वाखाली, माजी खासदार आनंद परांजपे आणि जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या सहकार्याने राज्य परिवहन महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. त्यामुळे ठाणे-शिंदी आणि शिंदी-ठाणे अशी दोन्ही बाजूंनी सेवा पुन्हा सुरू झाली आहे. या मार्गावर पनवेल, पेण, माणगाव, महाड, पोलादपूर, खेड, वेरळ फाटा आदी महत्त्वाच्या स्थानकांवरून प्रवासाची सोय उपलब्ध झाली असून, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. खोपट डेपोवरून रात्री ९.३० वाजता बस सुटणार असून, शिंदीवरून दुपारी १ वाजता परतीचा प्रवास होणार आहे. तसेच या गाडीचे आरक्षण ऑनलाइन तसेच बसस्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आले असून, प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







