नवी मुंबई : महानगरपालिकेच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारे ‘शिक्षण रूपांतर धोरण २०२६’ महासभेत मंजूर करण्यात आले असून, यामुळे शहरातील महापालिका शाळांचा चेहरामोहरा बदलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बुधवारी झालेल्या महासभेत सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडलेला प्रस्ताव सर्वानुमते मंजूर झाला. या धोरणामुळे महापालिका शाळांची गुणवत्ता उंचावण्याबरोबरच ४८ हजार विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाशी जोडण्यास मदत होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. शहरातील एकूण ८० महापालिका शाळांपैकी ५६ प्राथमिक शाळांमध्ये बालवाडीचे वर्ग इंग्रजी माध्यमातून सुरू होणार आहेत. तसेच शहरातील इतर शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्याचे धोरण महापालिकेने आखले आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांनाही इंग्रजी शिक्षणाची समान संधी मिळावी, हा यामागील प्रमुख उद्देश असल्याचे सागर नाईक यांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी मराठी भाषेचे स्थान अबाधित ठेवत तिच्या संवर्धनासाठी स्वतंत्र उपाययोजना करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार आगामी शैक्षणिक वर्षापासून या धोरणाची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. बालवाडीपासून इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्याची तयारी महापालिकेने केली असून, लहान वयातच विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. महापौर सुजाता पाटील यांनी याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक पद्धतीतही बदल करण्यात येणार आहेत. चौथी आणि सातवी इयत्तेत बुद्धिमत्ता चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांची क्षमता व आवड ओळखली जाणार असून, त्यानुसार पुढील शैक्षणिक दिशा ठरवली जाईल. सातवीपासून कौशल्याधारित शिक्षणाचा समावेश करत रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या आधुनिक विषयांना अभ्यासक्रमात स्थान दिले जाणार आहे. तसेच क्रीडा व शारीरिक विकासालाही धोरणात महत्त्व देण्यात आले आहे.







