वसई : वसई आणि भाईंदरला जोडणाऱ्या रो-रो फेरी सेवेच्या वेळापत्रकात कायमस्वरूपी बदल करण्यात आला आहे. १ एप्रिल पासून हे नवीन वेळापत्रक अंमलात येणार असून, प्रवाशांच्या मागणीचा विचार करून व्यवस्थापनाने फेऱ्यांच्या वेळेत विशेष बदल केले आहेत. लोकलमधील वाढती गर्दी, खराब रस्ते आणि वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी, तसेच दिवसेंदिवस वाढत जाणारा उकाडा यामुळे अनेकजण वसई ते भाईंदर दरम्यान प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या जलमार्गाचा पर्याय निवडतात. सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या मार्फत या फेरी बोटी चालवल्या जातात. तर ३३ वाहने आणि १०० प्रवासी अशी या फेरीबोटींची क्षमता आहे.
वसई ते भाईंदर दररोज मोठ्या संख्येने प्रवासी करतात. पण अनेकदा दहिसर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी आणि महामार्गावरील विकास कामांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी यामुळे अनेकांना वेळेत फेरी बोटीमध्ये चढता येत नव्हते. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीनुसार सुरुवातीला भाईंदरहून सुटणाऱ्या शेवटच्या दोन फेऱ्यांच्या वेळेत १५ मिनिटांचा बदल करण्यात आला होता. पण, त्यानंतर रो-रो सेवेच्या जुन्या वेळापत्रकात काही कायमस्वरूपी बदल करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. या मागणीनुसार १ एप्रिलपासून नवे वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. ज्यात मुख्यत्वे दुपारनंतरच्या फेऱ्यांमध्ये प्रामख्याने बदल करण्यात आला असल्याची माहिती फेरी बोट व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. वसई आणि भाईंदरहून सकाळी सुटणाऱ्या फेऱ्या पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे नियमित सुरू राहणार आहेत. पण, दुपारी चालकांच्या विश्रांतीच्या वेळेत १५ मिनिटांनी घट केल्यामुळे दोन्ही बाजूंनी दुपारी २ वाजता पुन्हा फेऱ्या सुरू होणार आहेत. तसेच भाईंदरहून ६ वाजून ४५ मिनिटांनी आणि ७ वाजता सुटणाऱ्या फेरी बोटी ७ वाजून ३० मिनिटांनी आणि ७ वाजून ४५ मिनिटांनी सोडण्यात येणार आहेत. तसेच भाईंदरहून सुटणाऱ्या शेवटच्या फेरीबोटीच्या वेळेतही १५ मिनिटांनी बदल करण्यात आला असून ती ९ वाजून १५ मिनिटांनी सोडण्यात येणार आहे.






