पालघर : केळवे रोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे केळवे रोड, झांजरोळी, बंदाठे, रोठे इत्यादी ग्रामपंचायत क्षेत्रामधील आदिवासी, बिगर आदिवासी जागा, गुरुचरण जागा तसेच महसूल व वन विभागाच्या जागांमध्ये किमान ५००० चाळींमधील घर उभी राहिली असून हा परिसर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून घातक ठरणार आहे. या ठिकाणी अनेक अवैद्य धंदे सुरु असून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नागरिकांसाठी हे आश्रयस्थान ठरत आहे. केळवे रोड पूर्वेकडील हा परिसर आगामी काळात नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील भागाप्रमाणेच अनियंत्रित व अनियोजित पद्धतीने विकसित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डहाणू तालुक्यात केंद्र सरकार लादलेल्या निर्बंधामुळे १९९१ पासून विकासावर मर्यादा आल्या. तर तारापूर येथील औद्योगिक वसाहतीमुळे वाढलेल्या लोकसंख्येला बोईसर पूर्वेकडील तसेच एमआयडीसी लगत असणाऱ्या गावांमध्ये मोकळ्या व खाजगी जमिनीत लहान चाळी उभारून निवास करण्याची पाळी ओढवली. मात्र बोईसर येथील मोकळी जागा संपुष्टात आल्यानंतर अनेक नागरिकांनी चाळीमधील निवासस्थानासाठी केळवे रोडकडे आपला मोर्चा वळवला. केळवे रोड पूर्वेकडील वेगवेगळ्या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी खातेदारांकडील मालकी जागांचा स्टॅम्प पेपरवर करार करून त्या ठिकाणी चाळी उभारण्यात आल्या आहेत.
केळवे रोड ग्रामपंचायतच्या हद्दीत अशा किमान अडीच हजार चाळीमधील निवासस्थाने असून झांजरोळी येथील निवासी गाळ्यांची संख्या २००० पेक्षा अधिक असल्याची माहिती पुढे आली आहे. बंदाठे व इतर गावांमध्ये देखील १००० पेक्षा अधिक नागरिक अशाच पद्धतीने निवास करत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे शासकीय, खाजगी, वन विभाग व महसूल विभागाच्या जागेसह सिडकोला देण्यात आलेल्या जागेवर देखील अतिक्रमण करून अशाच प्रकारचे चाळींचे साम्राज्य थाटल्याचे दिसून आले आहे. २०० ते ३०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या या गाळ्यांसाठी दर महिन्याला रेल्वे स्टेशनपासून असलेल्या अंतरावर आधारित एक ते दीड हजार रुपये भाडे आकारणी केली जात असून एका चाळीची किंमत तीन ते पाच लाख रुपये आहे. चाळी उभारण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत व पुढाऱ्यांचे सहकार्य लाभत असून महावितरण कंपनी व ग्रामपंचायतीकडून अशा चाळींना घरपट्टी व विद्युत जोडणी दिली जात असल्याने नागरिकांना कमी किमतीमधील अधिवास प्राप्त होत आहे. मुंबई ठाणे परिसरात असणारे भाजीविक्रेते, वेगवेगळे साहित्य विक्रेते, रिक्षा चालक, गैर धंदे चालवणारे व्यक्ती, अधिकांश समूहामध्ये तर काही आपल्या कुटुंबीयांसह या ठिकाणी निवास करत असून येथील अधिकतर नागरिक हे पहाटे व सकाळी मुंबईकडे रवाना होऊन रात्री उशिरा केळवे रोड येथे परतत असल्याचे दिसून आले आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने ही मंडळी कुपनलिकेच्या पाण्यावर उदरनिर्वाह करत असून अनेक चाळींना शौचालयाची व्यवस्था नसल्याने परिसरात अस्वच्छतेचे वातावरण पसरले आहे. पालघरचे तत्कालीन तहसीलदार सुनील शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी केळवे रोड येथील अनधिकृत चाळी विरुद्ध मोहीम उघडली होती व सुमारे ६०० ते ८०० चाळी जमीनदोस्त केल्या होत्या. मात्र महसूल विभागाची पाठ फिरल्यानंतर काही दिवसातच पुन्हा या अनधिकृत चाळी उभ्या राहिल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे चाळी बांधण्याचे काम स्थानिक पुढाऱ्यांकडून होत असल्याने त्याविरुद्ध कारवाई करण्यास महसूल तसेच इतर कोणताही विभाग गेल्यास त्यांच्याविरुद्ध मज्जाव करण्यासाठी गर्दी एकत्रित केली जाते असे देखील दिसून आले आहे. केळवे रोड पूर्वेकडील बहुतांश भागाच्या जागेची आखणी पूर्ण नसल्याने जागेचे नेमके वर्गीकरण निश्चित झालेले नाही. शिवाय कारवाई करण्यासाठी स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांकडे मनुष्यबळाची मर्यादा असून नियोजित पद्धतीने कारवाई होणे अपेक्षित आहे. कारवाई करताना आवश्यक पोलीस बंदोबस्त व राजकीय हस्तक्षेप होणार नाही यासाठी खबरदारी घेणे देखील आवश्यक असून कारवाई केलेल्या ठिकाणी पुन्हा नव्याने बेकायदेशीर शाळेची उभारणी होणार नाही याकरिता अतिक्रमण विरोधी पथक कार्यरत ठेवणे देखील आवश्यक झाले आहे.







