वृत्तसंस्था : आपण कधी ना कधी डॉक्टरकडे गेलो असू त्यावेळी डॉक्टर आपले म्हणणे ऐकून घेतात आणि कागदावर प्रस्क्रिप्शन लिहितात. पण हे लिहिलेले प्रिस्क्रिप्शन समजायला इतके किचकट असते की आता आपण ते पाहतदेखील नाही. फारफार तर मेडीकलवाले हे हस्ताक्षर समजू शकतात. हे अनेक वर्षांपासून सुरु असल्याने रुग्णांनादेखील याची सवय झालीय. पण यापुढे असे होणार नाही. अनेकदा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची लेखन इतकी गुंतागुंतीची असते की रुग्णांना, फार्मासिस्टला किंवा इतर डॉक्टरांनाही ते समजणे कठीण जाते. यामुळे चुकीचे औषध दिले जाणे, डोस चुकणे किंवा गंभीर आरोग्य धोके निर्माण होऊ शकतात. पण जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हे प्रकरण गांभीर्याने घेत महत्वाचा निर्णय दिलाय.
अस्पष्ट प्रिस्क्रिप्शनमुळे औषधांच्या चुका होऊन रुग्णांचे नुकसान होते.अशा चुकांमुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. विशेषतः वृद्ध आणि गंभीर आजारी लोकांचा धोका वाढतो. ही समस्या फक्त रुग्णांपुरती मर्यादित नाही, तर आरोग्य व्यवस्थेलाही प्रभावित करते, अशी माहिती राष्ट्रीय संस्थेने दिलीय. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२५ मध्ये डॉक्टरांच्या अस्पष्ट लेखनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.स्पष्ट प्रिस्क्रिप्शन हा भारतीय संविधानाच्या कलम २१ अंतर्गत आरोग्याच्या मूलभूत अधिकाराचा भाग आहे. अस्पष्ट लेखनामुळे रुग्णांना चुकीचे उपचार मिळू शकतात आणि त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला (NMC) कारवाई करण्यास भाग पाडले गेले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डिसेंबर २०२५ मध्ये एनएमसीने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना नवे निर्देश जारी केले. डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन स्पष्ट आणि वाचता येईल असे लिहावे. शक्यतो मोठ्या कॅपिटल अक्षरात आणि जनरिक नावाने औषधे लिहावीत. अस्पष्ट प्रिस्क्रिप्शन स्वीकारले जाणार नाहीत. कारण ते रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करतात, असे एनएमसीने स्पष्ट केले आहे. हे नियम आधीपासून होते पण आता त्यांची कडक अंमलबजावणी होणार आहे. या नव्या नियमांमुळे रुग्णांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन मिळू शकणार आहे. ज्यामुळे औषधांच्या चुका कमी होतील आणि उपचार सुरक्षित होतील. या दरम्यान डॉक्टरांन अधिक सावध राहावे लागेल आणि भविष्यातील डॉक्टर चांगले प्रशिक्षित होतील. एकूणच आरोग्य सेवेत पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे रुग्णांच्या हितासाठी महत्त्वाची पावले आहेत आणि त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली तर अनेक समस्या दूर होतील.







