नागपूर : सैनिकांनी देशासाठी केलेले समर्पण कुठल्याही मूल्यांमध्ये मोजता येत नाही. सैन्यातील खडतर जीवन जगून देशासाठी त्याग करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनातूनही सैनिकांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येते. हा निधी सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रामगिरी शासकीय निवासस्थानी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी व्यासपीठावर माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार, माजी सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल मनोहर ठोंगे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, जिल्हाधिकारी विपिन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शहीद झालेल्या सैनिकाच्या जीवनाचे मोल करता येणे शक्य नाही. मात्र त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी शासनाच्यावतीने 25 लाख रुपये देण्यात येत होते. यामध्ये चार पटीने वाढ करण्यात येऊन एक कोटी रुपये करण्यात आले आहे. शासनाकडून शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्यात येते. सेनेप्रती भाव असलेले अनेक नागरिक आपल्या रोजच्या मिळकतीमधून ध्वजदिन निधीसाठी पैसे देत असतात. हा निधी सत्कारणी लागतो, या निधीमधून अनेक उपक्रम राबविण्यात येतात. ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये जगाने भारतीय सेनेचा पराक्रम बघितला आहे. त्यानंतर भारतीय सेनेचा शक्तिशाली देशाच्या सेनेमध्ये समावेश झाला आहे. भविष्यातही कुठलेही आव्हान आल्यास भारतीय सेना ते पेलण्यासाठी सक्षम आहे. सेनेच्या शौर्याने आपण देशाच्या सर्व सीमा सुरक्षित ठेवत आहोत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी काढले. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात नागरिकांनी आपापल्या परीने सहभाग देऊन सेनेप्रती आपला भाव व्यक्त करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.







