पिंपरी : नदी, नाल्यात बांधकाम राडारोडा टाकणे, प्लास्टिकचा वापक करणे, उघड्यावर कचरा टाकणे आणि जाळणाऱ्यांवर महापालिकेच्या उपद्रव शोधपथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तीन हजार ७७६ नागरिक, आस्थापनाचालकांकडून एक कोटी ९० लाख ४३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातील पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी, नैसर्गिक ओढे नाल्यांमध्ये राडारोडा, सार्वजनिक ठिकाणी पदपथ, रस्ते, मोकळ्या जागेत कचरा टाकला जात आहे. घरात साचलेला कचरा पिशवीत भरून रस्ते, नाल्यात फेकून दिला जातो. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका करणे, सार्वजनिक सभा आणि समारंभ संपल्यानंतर साफसफाई केली जात नाही. महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण करणे, व्यावसायिक आस्थापनेमार्फत कचरा पेटी न ठेवणे, जैववैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यामध्ये किंवा उघड्यावर फेकणे, कचरा जाळणे, बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणे, मोकळ्या जागेत कचरा जमा करणे, डास उत्पत्तिस्थानाची निर्मिती करणे, लघुउद्योजक किंवा कारखानदारांमार्फत रासायनिक सांडपाणी प्रकिया न करता थेट नाल्याद्वारे नदीत सोडण्याचे प्रकार निदर्शनास आले होते.
महापालिकेने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी दोन खासगी संस्थेची नियुक्ती केली. या संस्थेची चार पथके शहरात दिवस-रात्र कारवाई करत आहेत. ऑक्टोबर २०२४ पासून ही कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. एका संस्थेच्या पथकाने आतापर्यंत दोन हजार ६८५ नागरिक व आस्थापनांवर कारवाई करत एक काेटी आठ लाख २७ हजार ९९० रुपयांचा दंड वसूल केला आहे. दुसऱ्या संस्थेच्या पथकांनी एक हजार ९१ नागरिकांकडून ८२ लाख १५ हजार ७० रुपयांचा दंड वसूल केला आहे. असा एकूण एक कोटी ९० लाख ४३ हजार ६० रुपयांचा दंड जमा करण्यात आल्याचे पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बन्सल यांनी सांगितले.







