मुंबई : विमान तिकीट बुकिंग केल्यानंतर त्यात ४८ तासांत बदल केल्यास प्रवाशांना कोणताही भुर्दंड सोसावा लागणार नाही. या कालावधीत तिकीट रद्द करून दुसरे तिकीटदेखील घेता येणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) हा बदल प्रस्तावित केला आहे.
ट्रॅव्हल एजंट अथवा पोर्टलद्वारे तिकीट खरेदी केल्यास परताव्याची जबाबदारी संबंधित एअरलाईन्सवर असेल. कारण, एजंट हे विमान कंपन्यांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी असतात, असेही ‘डीजीसीए’ने स्पष्ट केले आहे. रकमेचा परतावा २१ कार्यालयीन दिवसांत करावा, असेही ‘डीजीसीए’ने प्रस्तावात म्हटले आहे. तिकीट बुकिंग केल्यानंतर २४ तासांच्या आत प्रवाशाने त्याच्या नावातील दुरुस्ती लक्षात आणून दिल्यास त्यात विनाशुल्क दुरुस्ती करावी लागेल. मात्र, असे तिकीट विमान कंपनीच्या संकेतस्थळावरून बुकिंग केलेले हवे. तिकीट रद्द केल्यानंतर मिळणाऱ्या परताव्यावरून अनेक तक्रारी दाखल होत असल्याने ‘डीजीसीए’ने नवीन बदल प्रस्तावित केले आहेत.







