पुणे : गहाळ झालेला मोबाइल संच परत मिळेल, याची शाश्वती नसते. पण, शिवाजीनगर पोलिसांनी नागरिकांचे गहाळ झालेले ५ लाख रुपयांचे ४१ मोबाईल संच स्वातंत्र्यदिनी परत मिळवून दिल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त हृषीकेश रावले व सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या हस्ते परत करण्यात आले. गहाळ झालेले मोबाइल संच परत मिळाल्याने तक्रारदारांनी आनंद व्यक्त केला. मोबाइल संचात महत्त्वाची माहिती, छायाचित्रे असतात. मोबाइल संचाच्या किमतीपेक्षा महत्त्वाची माहिती गहाळ झाल्याने तक्रारदार हळहळ व्यक्त करतात. शिवाजीनगर परिसरातील गर्दीच्या ठिकाणांहून नागरिकांचे मोबाइल संच चोरीला गेले होते, तसेच काहींचे मोबाइल संच गहाळ झाले होते. याप्रकरणी तक्रारदारांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस अंमलदार तेजस चोपडे व आदेश चलवादी यांनी शिवाजीनगर परिसरात हरवलेल्या मोबाईलचा डेटा तयार करुन त्याबाबत तांत्रिक तपास करुन तसेच वारंवार पाठपुरावा करुन हरविलेले मोबाईल फोन हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात व इतर राज्यात वापरत असल्याचे निदर्शनास आले. हे मोबाईल जे वापर करत होते. पोलिसांनी मोबाइल संचांच्या ‘आयएमईआय’ क्रमांकांवरून तपास केला. तांत्रिक तपास करून ४१ मोबाइल संच शोधून काढले. महागडे मोबाइल संच परत मिळाल्याने तक्रारदारांनी आनंद व्यक्त केला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोलकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) धनंजय पिंगळे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनिषा वलसे, पोलीस हवालदार नलिनी क्षीरसागर, पोलीस अंमलदार आदेश चलवादी, तेजस चोपडे, नवनाथ आटोळे यांनी केली आहे.
मोबाईल हरवल्याची तक्रार तात्काळ ऑनलाईन पुणे पोलिसांच्या punepolice.gov.in/lostfoundReg या वेबसाईटला प्रथम तक्रार नोंद करावी़ नोंद करताना जवळचे पोलीस ठाण्याचे नाव, त्यात सिलेक्ट करावे. आपले जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन त्याची एक प्रत द्यावी़ त्यानंतर हरवलेले मोबाईलमधील त्याच नंबरचे सीमकार्ड घेऊन ते चालू करुन घेतल्यानंतर शासनाचे या पोर्टलवर नोंद करावी. नोंद करताना https:www.ceir.gov.in/(CEIR) या वेबसाईटवर अर्जदाराचे तक्रारीची प्रत, मोबाईल पावती तसेच ओळखपत्र याची PDF अपलोड करुन चालू केलेल्या मोबाईलवर OTP प्राप्त करुन समाविष्ट(सबमिट) करावी.







