कोकण : यंदाच्या वर्षी जून महिन्याऐवजी मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली आणि मान्सूनच्या या लवकरच्या आगमनानं सर्वांचीच तारांबळ उडाली. या साऱ्यात कोकण रेल्वे मात्र निवांत दिसत असून, यामागचं मुख्य कारण ठरत आहे ते म्हणजे बहुतांशी प्रमाणात या मार्गावर पूर्णत्वास गेलेली पावसाआधीची काही तांत्रिक आणि दुरूस्तीची कामं. याच प्रगतीमुळं यंदाच्या वर्षी कोकण रेल्वेनं मोठा निर्णय घेतला असून, पावसाळी वेळापत्रकातून दिवस १५ वगळून नव्यानं या वेळापत्रकाच्या तारखा जारी केल्या आहेत. प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक बाब.
पावसाच्या दिवसांमध्ये सहसा वळणवाटांतून जाणाऱ्या कोकण रेल्वेमार्गावर अनेक आव्हानं येतात. रेल्वेमार्गावर येणाऱ्या धुक्यामुळं दृश्यमानता कमी होते. त्यातच काही रेल्वे मार्गांवर दरड कोसळण्याचा धोका असतो. तत्सम घटनांमुळं रेल्वेगाड्या खोळंबतात आणि अशा वेळी रेल्वे अपघाताचा धोकाही बळावतो. या कारणास्तव सावधगिरी म्हणून दरडप्रवण क्षेत्रातील संभाव्य दरडी कोकण रेल्वेनं काढण्याची कामं केली आहेत. शिवाय दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळ्या बसवल्या आहेत. तरीही परिस्थिती बिघडू नये यासाठी कोकण रेल्वे मार्गावर ६३६ कर्मचारी २४ तासांच्या गस्तीवर ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान मान्सूनच्या दिवसांत मुसळधार पावसादरम्यान रेल्वेगाडीचा वेग ताशी ४० किमी ठेवण्याच्या सूचना सर्व लोको पायलटना देण्यात आल्या आहेत. रेल्वे मार्गावरील धुक्यामुळं कमी होणाऱ्या दृश्यमानतेची आणि पावसाची वस्तुस्थिती पाहता नियमानुसार रेल्वेचे वेग नियंत्रित ठेवले जाणार असले तरीही यंदा पावसाळी वेळापत्रक १० जून ते ३१ ऑक्टोबरदरम्यान नव्हे, तर १५ जून ते २० ऑक्टोबरदरम्यान लागू असणार आहे. यंदाच्या वर्षी पावाळ्याआधीची रेल्वेची कामं पूर्ण झाल्यामुळं १५ दिवस या वेळापत्रकातून कमी करण्यात आल्यामुळं प्रवाशांना मोठा दिलासा मिळत असून, आता याचदरम्यान गणेशोत्सवाचाही कालावधी येत असल्यानं त्यादरम्यानच्या प्रवासात खोळंबा होणार नाही याचीच पूर्ण काळजी रेल्वेनं घेतली आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.







