कल्याण : कल्याणमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. सप्तश्रृंगी इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना एका शाळेची भिंत कोसळली आहे. कल्याणच्या केबीके इंटरनॅशनल शाळेची भिंत कोसळून ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अंश राजकुमार सिंह (वय ११) असं मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचं नाव असून परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी कल्याण केबीके इंटरनॅशनल स्कूलजवळ लहान मुलं खेळत होतं. यावेळी अचानक शाळेची भिंत कोसळली. अंश यात कुमार सिंह याचा जागीच मृत्यू झाला तर सोहेब शेख (वय ६) आणि अभिषेक सहानी (वय १०) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु करण्यात आले आहेत. शाळेजवळ मुलं खेळत असताना अचानक भिंत कोसळली. दरम्यान स्थानिकांनी भिंत दुरुस्तीसाठी वारंवार शाळेकडे पाठपुरावा केला होता. मात्र मुजोर शाळेच्या संचालकांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळे आज मोठी दुर्घटना घडली. शाळेची भिंत कोसळून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. दोन मुल गंभीर जखमी झाली आहेत, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.





