मुंबई : मुंबईमध्ये कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना (Mumbai Crime) घडली आहे. दहिसरमधील गणपत पाटील नगर मध्ये वास्तव्यास असणाऱ्या दोन कुटुंबांत तुफान हाणामारी झाली. ज्याचे रुपांतर नंतर हल्ल्यात झाले आणि तीन जणांना मृत्यू झाल्याचे खळबळजनक वृत्त आहे. दोन कुटुंबात वाद इतका विकोपाला गेला होता की, चाकू आणि कोयत्याने एकमेकांवर वार करण्यात आले. जुन्या वादातून ही भयंकर घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दहिसर पश्चिम एम.एच.बी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपत पाटील नगर परिसरात दुपारी ४.३० च्या सुमारास ही भयंकर घटना घडली आहे. हमीद शेख (वय ४९ वर्षे), रमणलाल गुप्ता (वय ५० वर्ष) आणि अरविंद गुप्ता (वय २३ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. जुन्या वादाच्या रागात दोन कुटुंब एकमेकांवर धावून गेले आणि तुफान राडा झाला. यामध्येच तेथील एका दुकानातून दोन्हीकडील लोकांनी चाकू आणि कोयता विकत घेतले. आणि पुन्हा दोन्हीकडून एकमेकांवर जोरदार हल्ला करण्यात आला. परिणामी तिघांचा जीव गेला आहे, तर ४ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी एम.एच.बी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, एम एच बी पोलीस ठाणे हद्दीतील गणपत नगर झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या शेख व गुप्ता या दोन कुटुंबांनी २०२२ मध्ये एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले होते. तेव्हापासून दोन्ही कुटुंबांचे वैर होते. रविवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास राम नवल गुप्ता यांच्या नारळ विक्री स्टॉल समोर अमित शेख हा दारू पिऊन आला आणि त्यांच्यात वाद सुरु झाला. एवढ्यात दोघांनीही त्यांची मुलं अमर गुप्ता, अरविंद गुप्ता व अमित गुप्ता. तर हमीद यांची मुलं अरमान हमीद शेख व हसन हमीद शेख यांना बोलावून घेतले. सगळे येताच जोरदार वाद उफाळला. वाद इतका विकोपाला गेला की, वादाचे रुपांतर हाणामारीत झाले, धारदार शस्त्राने वार करण्यात आले. सदर मारहाणीमध्ये राम नवल गुप्ता (वडील) आणि अरविंद गुप्ता यांचा मृत्यू झाला आहे. तर अमर गुप्ता व अमित गुप्ता जखमी आहेत. तसेच हमीद शेख (वडील) हे देखील मृत पावले आहेत. त्यांचा मुलगा अरमान शेख व हसन शेख जखमी आहेत. शताब्दी हॉस्पिटल येथून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला असून. एका आरोपीला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत आणि परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.







