पुणे : रेल्वे प्रवासादरम्यान हरवलेली किंवा घरातून पळून गेलेली मुले शोधून त्यांना सुरक्षितपणे कुटुंबापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ या उपक्रमांतर्गत पुणे रेल्वे विभागाने गेल्या आर्थिक वर्षात ४१२ मुलांची यशस्वी सुटका केली आहे. कौटुंबिक वाद, रागाच्या भरात घेतलेले निर्णय, तसेच शहरातील चकाकीचे आकर्षण यामुळे अनेक मुले घर सोडून अज्ञात ठिकाणी निघून जातात. अशा परिस्थितीत रेल्वे संरक्षण दल (RPF) या मुलांचा शोध घेऊन त्यांना चुकीच्या प्रवाहात जाण्यापासून वाचविण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहे. या मोहिमेद्वारे मानवी तस्करीसारख्या गंभीर धोक्यांपासूनही अनेक मुलांचे संरक्षण करण्यात आले आहे.
आरपीएफचे जवान आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या मुलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातात व समुपदेशनाद्वारे त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाते. त्यानंतर संबंधित मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येते. या ४१२ मुलांमध्ये ३५५ मुलगे आणि ५७ मुलींचा समावेश असून, दर महिन्याला सरासरी ३५ ते ४० मुलांना त्यांच्या कुटुंबाशी पुन्हा जोडले जात आहे. पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतरुमार बेहेरा यांनी सांगितले की, अनेकदा घरातील किरकोळ वादामुळे मुले घर सोडतात आणि शहरात आल्यावर दिशाभूल होऊन रेल्वे स्थानकांवर आसरा घेतात. अशा मुलांना शोधून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य आरपीएफ सातत्याने करत असून, या मोहिमेमुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.







