मुंबई : रेल्वे स्थानकांसह रेल्वेगाड्यांमधील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने केलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत फुकट्या प्रवाशांवर बडगा उगारण्यात आला आहे. विनातिकीट प्रवाशांकडून मध्य रेल्वेने ३०० कोटींचा दंड वसूल केला असून, यात सर्वाधिक विनातिकीट प्रवासी मुंबई विभागातील आहेत. रेल्वे स्थानकातील गर्दी व्यवस्थापनांसाठी सर्व क्षेत्रीय रेल्वेला विनातिकीट प्रवाशांवर अंकुश ठेवण्यासाठी रेल्वे मंडळाने निश्चित लक्ष्य दिले होते. मध्य रेल्वेने रेल्वे मंडळाच्या निर्धारित लक्ष्यापेक्षा १२ टक्के अधिक महसूल मिळवत अग्रस्थान पटकावले आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ आर्थिक वर्षात विनातिकीट प्रवासी, अयोग्य तिकीटाने प्रवास करणे अशा प्रकरणात मध्य रेल्वेने ४६.२६ लाख प्रवाशांवर कारवाई केली. मुंबई विभागाने २०.५६ लाख प्रवाशांवर कारवाई करीत ११५.२९ कोटींचा दंड वसूल केला. मध्य रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये मध्य रेल्वेने अव्वल क्रमांक पटकावला आहे. भुसावळने ६६.३३ कोटी, नागपूरने ३४.५२ कोटी, सोलापूरने ३७.७४ कोटी आणि पुणे विभागाने २८.१५ कोटींचा महसूल मिळवला आहे.
मध्य रेल्वेमधील दोन महिला वरिष्ठ तिकीट परीक्षकांसह एकूण २२ तिकीट तपासणीसांनी वैयक्तिकरित्या १ कोटीहून अधिक दंड वसूल केला आहे. मुंबईतील तिकीट निरीक्षक सुनील नैनानी यांनी २०२३-२४ च्या आर्थिक वर्षात १.९२ कोटींचा दंड वसूल करत सर्वाधिक दंड वसूल करणाऱ्या तिकीट तपासणीसाचा बहुमान पटकावला. मध्य रेल्वेच्या उपनगरीय, मेल-एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करण्यात येत आहे. यामुळे तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.